Home > News Update > दिल्ली हिंसाचार : २ शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

दिल्ली हिंसाचार : २ शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

दिल्ली हिंसाचार : २ शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार
X

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाला झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला धक्का बसला आहे. दोन शेतकरी संघटनांनी या आंदोलनामधून माघार घेतली आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या वृत्तानुसार All India Kisan Sangharsh Coordination Committee आणि भारतीय किसान युनियन (Bhanu) या दोन संघटनांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलनातून माघार घेतली आहे. ऑल इंडिया किसान संघर्ष समितीचे नेते व्ही.एम.सिंग यांनी सांगितले की, ज्यांचा हेतू वेगळा आहे त्यांच्यासोबत आम्ही आता आंदोलन करु शकत नाही. त्याचबरोबर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीच रॅलीचा मार्ग बदलण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला असा आरोपही त्यांनी केला आहे.

हिंसाचार प्रकरणी शेतकरी संघटनांच्या ९ नेत्यांविरोधात FIR

प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २०० आंदोलकांनी ताब्यात घेतले आहे. तर २२ FIR दाखल केल्या आहेत. यामध्ये योगेंद्र यादव, राकेश टिकैत यांच्यासह किमान १० शेतकरी नेत्यांविरोधात FIR दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन कऱणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय़ घेतला होता. पोलिसांनी परवानगी देताना या शेतकऱ्यांना मोर्चाचा मार्ग ठरवून दिला होता. पण तो मार्ग सोडून काही आंदोलकांनी लालकिल्ल्यात प्रवेश करत तिथे ध्वज फडकावला होता. त्याचबरोबर शहरात इतर ठिकाणी आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत पोलिसांवरही हल्ले केल्याचे प्रकार घडले होते.

Updated : 27 Jan 2021 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top