Home > News Update > दिल्लीत शेतकऱ्यांचा ठिय्या कायम, आज सरकारशी पुन्हा चर्चा

दिल्लीत शेतकऱ्यांचा ठिय्या कायम, आज सरकारशी पुन्हा चर्चा

दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरात पाठिंबा वाढतोय. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस या आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

दिल्लीत शेतकऱ्यांचा ठिय्या कायम, आज सरकारशी पुन्हा चर्चा
X

नवीन कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कायदे रद्द झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार करत आपला ठिय्या कायम ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या ३५ प्रतिनिधींसोबत आज पुन्हा चर्चेची पुढची फेरी होणार आहे. पण कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. पण चर्चेच्या आजच्या फेरीमध्ये काही तरी तोडगा निघेल अशी आशा आहे असे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, तसंच या कायद्यांना आपलाही विरोध आहे, असे अमित शाह यांना सांगितल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. पण पंजाबच्या अर्थव्यवस्थेचा आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने हा मुद्दा लवकर सोडवावा असे आवाहनही त्यांनी केल आहे.

दरम्य़ान सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास दिल्लीचे सर्व रस्ते रोखण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

Updated : 3 Dec 2020 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top