Home > News Update > राजनाथ सिंह यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद, डॉ. अमोल कोल्हे म्हणाले

राजनाथ सिंह यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद, डॉ. अमोल कोल्हे म्हणाले

राजनाथ सिंह यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद, डॉ. अमोल कोल्हे म्हणाले
X

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्त्यव्याने मोठा वाद उफाळून आला आहे. राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडले आणि राष्ट्रनायक झाले. असं विधान राजनाथ सिंह यांनी केलं होतं. त्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

अनेक लोकांच्या तसंच इतिहास तज्ज्ञांच्या मते रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचा महाराजांना घडवण्यात कुठलाही वाटा नसल्याचं मत आहे. यावर आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते." असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे.

दोन दिवसांपूर्वीच एका हिंदी दिग्दर्शकाने मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत, असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे, खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Updated : 28 Aug 2021 9:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top