'ओ शेठ' गाण्याची चोरी?,; संध्या- प्रनिकेतच्या डोळ्यात पाणी
X
नाशिक : सोशल मीडियावर धूम करत असलेल्या, आणि अवघ्या महाराष्ट्राला ठेका धरायला लावलेल्या 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय ग्रेट' या गाण्याच्या हक्कावरून एक नवा वाद समोर आला आहे . गीतरचनेबरोबरच संगीत देण्याचे काम करणाऱ्या संध्या केशे-प्रनिकेत खुने यांनी गाण्याचे गायक उमेश गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उमेश गवळी यांनी गाण्याची चोरी केल्याचे म्हणत त्यांनी जितेंद्रभावेजलाईव्ह या फेसबुक पेजवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या गाण्याची गीतरचना आणि संगीत करणाऱ्या संध्या-प्रनिकेत यांच्याच युट्युब चॅनेलला गायक उमेश गवळी यांनी स्ट्राईक टाकला आहे. त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या संध्या-प्रनिकेतच्या उत्पन्नाच्या साधणारावर गदा आली आहे.
दरम्यान जितेंद्रभावेजलाईव्ह या फेसबुक पेजवरून आपली भावना व्यक्त करताना संध्या केशे हिने म्हटले आहे की, या गाण्यामुळे मला, प्रनिकेतला आणि गायक उमेश गवळी यांना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, भरभरून प्रेम दिलं, मात्र या गाण्याचा मेकींग व्हिडिओचे राईट्स आपल्याला मिळावेत अशी विनंती उमेश गवळी यांनी प्रनिकेतकडे केली, वास्तविक उमेश गवळी यांना अतिशय कमी मानधन आम्ही दिले असल्याने त्यांना देखील या गाण्याच्या माध्यमातून जास्तीचे मानधन मिळावे म्हणून आम्ही त्या राईट्स देण्याचे ठरवले, मात्र त्यांनी आमच्याच युट्युब चॅनेलला स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे, याबाबत आम्ही त्यांच्याशी वारंवार मोबाईलवरून संभाषण केले आहे. त्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे आहेत. याबाबत बसून चर्चा करण्यासाठी आम्हाला उमेश गवळी यांनी पुण्याला येण्याचे सांगितले होते त्यानुसार आम्ही पुण्याला देखील जाणार होतो. मात्र उमेश गवळी या स्ट्राईक काढला नसल्याने आमच्या चॅनेलवरून कॉपीराईटमुळे हे गाणं काढून टाकण्यात आलं. असा आरोप संध्या-प्रनिकेत यांनी केला आहे.
सोबतच या गाण्याचे सर्व हक्क आमच्याकडे असताना आणि गायक उमेश गवळी यांनी वेगवेगळ्या माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत आमचा वारंवार उल्लेख केलेला असताना त्यांनी अश्या पद्धतीने गाण्यावर हक्क सांगणे चुकीचे आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर समेट करू असं सांगणाऱ्या उमेश गवळी यांनी गाण्यावर हक्क सांगितल्याने आमचे उत्पन्नाचे साधनच बंद झाले असल्याचे म्हणत आपल्याला न्याय मिळावा अशी भावना संध्या-प्रनिकेतने व्यक्त केली आहे.
नाशिकची संध्या केशे आणि उस्मानाबादच्या प्रनिकेत खुने या जोडीने तब्बल चार वर्षांपासून एकत्र काम करत जवळपास ५० गाणी लिहिली आहेत आणि संगीतबद्ध केली आहे. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 'ओ शेठ' गाण्याने. मीम्ससह इन्स्टाग्राम रिल्समुळे या गाण्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. इन्स्टाग्रामवर जवळपास तीन लाख ६३ हजारांहून अधिक रिल्स या गाण्यावर तयार झाले आहेत. गाण्याच्या राइट्ससाठी नामांकित कंपन्यांकडून विचारणा झाली आहे. संध्या-प्रनिकेत जोडीने हे गाणे स्वतः व्हिडिओ स्वरूपात आणले.मात्र आता या गाण्याच्या हक्कावरून नवा वाद निर्माण झाल्याने संध्या- प्रनिकेतला न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे.






