Home > News Update > मी पुन्हा येईन'च्या नादात जनतेचा जीव धोक्यात, अतुल लोंढे यांचा फडणवीसांवर निशाणा

मी पुन्हा येईन'च्या नादात जनतेचा जीव धोक्यात, अतुल लोंढे यांचा फडणवीसांवर निशाणा

मी पुन्हा येईन'च्या नादात जनतेचा जीव धोक्यात, अतुल लोंढे यांचा फडणवीसांवर निशाणा  congress spokesperson atul londhe criticize devendra Fadnavis over covid situation in maharashtra


राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात दररोज कोरोनामुळे शेकडो लोकांचा राज्यात मृत्यू होत आहे. असा परिस्थितीत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

सध्या राज्यसरकार लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन लावताना गरिबांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने केली आहे. यावर आज कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.


कोरोनाने महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो रुग्ण वाढत असताना भारतीय जनता पक्षाकडून राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेने भयानक स्थिती उद्भवली आहे. याचा मुकाबला करायचा असेल तर लॉकडाऊन व लसीकरण हाच पर्याय आहे.

मात्र, लसी उपलब्ध नाहीत आणि 'उत्सव'ची इव्हेंटबाजी भाजपा करत आहे. हा प्रकार मढ्यावरचे लोणी खाण्याचा असून केवळ 'मी पुन्हा येईन'च्या चक्करमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे पातक महाराष्ट्रद्रोही भाजपा करत आहे, असं म्हणत लोंढे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली आहे.

नागपूरमध्येही कोरोनाने थैमान घातले असताना महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा व भाजपाच्या नेत्यांचा खोटारडेपणा सुरू आहे. महानगरपालिकेतील लसींचा साठा आज संपत आहे. उद्यापासून लस मिळाली नाही तर मृत्यूंचं तांडव उभं राहण्याची भिती असताना केवळ क्रेडिट घेण्यासाठी इव्हेंटबाजी करत जनतेच्या जीवांशी खेळ चालवला आहे. लसच नाही तर उत्सव कसला करता. हा उत्सव नसून युद्ध आहे आणि युद्धात तत्पर रहायला हवे ती तत्परता दिसत नाही.

महापौर दयाशंकर तिवारी हे 500 बेड्सचे रुग्णालयात उभे करण्याचे सांगत आहेत. परंतु सध्या 250 बेड्स उपलब्ध आहेत. त्यासाठीच मनुष्यबळ नाही तर नवीन रुग्णालयाचे खोटे आश्वासन का देता?

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही 5000 रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत असे जाहीर करुन त्यासाठी एक नंबरही देण्यात आला होता पण त्यावर चौकशी केली असता तेही खोटे निघाले. अशा पद्धतीने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे.

कोरोनाच्या या गंभीर संकटात राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. राज्य सरकार त्यांच्या परीने योग्य काम करत आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत आणली पाहिजे. मात्र, भाजपाला या महामारीच्या संकटातही आपली राजकीय पोळी भाजायची आहे. भाजपाला केवळ विरोधासाठी विरोध आणि फक्त राजकारण करायचे आहे अशी टीका लोंढे यांनी केली आहे.

Updated : 12 April 2021 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top