Home > News Update > पुद्दुचेरीत ऑपरेशन कमळ यशस्वी का?

पुद्दुचेरीत ऑपरेशन कमळ यशस्वी का?

पुद्दुचेरीत ऑपरेशन कमळ यशस्वी का?
X

नायब राज्यपाल किरब बेदी यांची हाकालपट्टी आणि दोन कॉंग्रेस आमदरांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आलेलं पुद्दुचेरीत काँग्रेसप्रणीत सरकार कोसळलं आहे. पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयशानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच पुदुच्चेरीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थितीदेखील लावली होती. नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पडले असून बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. दरम्यान मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे.

मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असं म्हटलं आहे. "आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू म्हटले जाईल," अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे.

"पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण सत्याचाच विजय होईल," असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता. नारायणसामी यांनी यावेळी भाजपा जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. "तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आम्ही दोन भाषांचा वापर करतो, पण भाजपा जबरदस्ती हिंदी लादत आहे," असं ते म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. मागील काही काळापासून बेदी आणि मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेदी यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. दोन आमदाराच्या राजीनाम्यान सरकार अस्थिर होऊन अल्पमतात आलं आहे. आता सरकार कोण स्थापणार? कि राष्ट्रपती राजवट लागू होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Updated : 22 Feb 2021 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top