मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्येला न जाण्याचा निर्णय
X
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत होणार आहे. पण या कार्यक्रमाला कोरोनाच्या संकटामुळे न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता तिथे कमीत कमी लोकांनी जाणे गरजेचे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला जाणार आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने बनवला आहे, तिथे राम मंदिर होणारच आहे. निमंत्रण मिळाले नाही म्हणून न जाण्याचा निर्णय घेतलेला नाही तर कोरोनामुळे उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे, मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कमीत कमी लोकांमध्ये भूमिपूजन करुन घ्यावे अशी भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले.
राम मंदिराचे भूमिपूजन ऱखडले आहे, त्यामुळे ते आधी होणे गरजेचे आहे. तसंच हा काही लग्न सोहळा नाही की निमंत्रणाच्या मानापमानाचा विचार शिवसेना करेल, असंही राऊत यांनी सांगितले आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन दर्शन घेतील आणि रामाची पुजाही करतील असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे.