‘मुख्यमंत्री होण्यासाठी, आपल्या मुलाला मंत्री बनवण्यासाठी शिवसेनेनं केला विश्वासघात’
X
केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी, आपल्या मुलाला मंत्री बनवण्यासाठी शिवसेनेनं विश्वासघात केला. जनादेशाचा अनादर केला अशी सणसणीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केलीय. नवी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते परिषदेस उपस्थित होते.
मागील निवडणूकींच्य़ा तुलनेत आपण अधिक जागा जिंकल्या होत्या. परंतु आपल्या मित्रपक्षाने, हिंदुत्वावर काम केलेल्या शिवसेनेने पुर्णपणे दगाबाजी केली. त्यांना रोज दोन वेळेला शरद पवारांकडे जायला वेळ होता. दिल्लीला जाऊन सोनियाजींना भेटायला वेळ होता परंतु महाराष्ट्रात देवेंद्रजींनी केलेला फोन घ्यायला त्यांना फुरसत नव्हती असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
“महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल असं वाटत असताना कुठेतरी विश्वासघात झाला. जनादेश मिळाला होता की भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena)असं दोघांनी सरकार करावं. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनादेश मिळाला होता की तुम्हाला विरोधी पक्ष म्हणुन बसायचं आहे. पण त्या जनादेशाचा अनादर करुन महाराष्ट्रामध्ये एक अभद्र, अनैतिक युती झाली आणि त्या युतीमधुन आपल्याला वेगळं ठेऊन महाराष्टमध्ये सरकार झालं.” अशी खंत चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली.