Home > News Update > जायकवाडी चे पाणी 'वाण धरणात' येणार ?

जायकवाडी चे पाणी 'वाण धरणात' येणार ?

जायकवाडी चे पाणी वाण धरणात येणार ?
X

बीड: राज्यात यावर्षी जास्तीच्या पावसामुळे जवळपास सर्वच धरणं भरली आहेत. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील वाण धरण अनेक वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरलं आहे. तर परिसरातील पावसावर अवलंबून असलेल्या वाण धरणात आता जायकवाडीचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

परळीची तहान भागवणारे वाण धरण जवळपास चार वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे शनिवारी धनंजय मुंडे यांनी धरणावर जाऊन विधिवत जलपूजन केले. तसेच, जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणण्यासाठी राज्य शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जायकवाडीचे पाणी आरक्षित झाल्यास परळीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

प्रत्येक निवडणुकीत परळी शहरातील पाणी प्रश्नावरून राजकारण होत असल्याचे नेहमीच पाहायला मिळायचे. तर जायकवाडीतील पाणी वाण धरणात आणण्याची मागणी सुद्धा अनेकदा झाली. परंतु निवडणूक होताच हा मुद्दा मागे पडायचा. मात्र, धनंजय मुंडे यांनी यावेळी यात विशेष लक्ष घातले असून, शासन स्तरावर ही मागणी सुरू आहे. त्यामुळे भविष्यात जर जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणण्याचा मार्ग मोकळा झालाच तर याचे पडसाद स्थानिक राजकारणात पाहायला मिळतील असे बोलले जात आहे.


Updated : 10 Oct 2020 3:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top