राष्ट्रवादीचा गृहमंत्री होतो तेव्हा अत्याचार वाढतात – गोपीचंद पडळकर
X
राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात, असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाळवणी गावात मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन त्याच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती.
त्या पीडित व्यक्तीची पडळकर यांनी बुधवारी भेट घेतली. आंतरजातीय प्रेमविवाहातून जरी हा प्रकार झाला असला तरी याला कोणीही जातीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण होईल अस कृत्य करू नका असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले. पण त्याचवेळी “राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होतो तेव्हा तेव्हा राज्यात अन्याय अत्याचार वाढतात,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना महाराष्ट्राचा कोरोना म्हटले होते. त्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात निदर्शनेही केली होती. आता पुन्हा एकदा पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.