Home > News Update > शेतकरी आंदोलन, पंजाबमध्ये भाजप आमदाराला मारहाण

शेतकरी आंदोलन, पंजाबमध्ये भाजप आमदाराला मारहाण

4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण यावर तोडगा निघतत नसल्याने पंजाबमध्ये आता याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

शेतकरी आंदोलन, पंजाबमध्ये भाजप आमदाराला मारहाण
X

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण झाले आहेत. पण सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी भाजपच्या एका आमदाराला मारहाण करत त्याचे कपडे फाडून टाकल्याचा प्रकार घडला आहे. पंजाबच्या मुक्तसार जिल्ह्यातील मलोट शहरात हा प्रकार घडला आहे. अरुण नारंग हे राज्य सरकारविरेधात पत्रकार परिषद घेणार होते. पण त्याआधीच तिथे शेतकऱ्यांची गर्दी जमली होती. नारंग येताच संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना मारहाण केली, त्यांचे कपडे फाड़ले आणि त्यांच्या तोंडाला काळेदेखील फासले. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत नारंग यांना वाचवले. या हल्ल्याला पंजाबमधील काँग्रेसचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

नारंग हे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेण्यासाठी पोहोचले. पंजाब सरकारच्या कामगिरीवर ते पत्रकार परिषद घेणार होते. पण त्यांची गाडी येताच तिथे जमलेल्या शेतकऱ्यांनी नारंग यांच्या गाडीवर ऑईल ओतले. त्यानंतर नारंग हे गाडीमधून खाली उतरले आणि त्यांचा या आंदोलकांशी वाद झाला. त्यानंतर मात्र आंदोलकांनी त्यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा कडे करत नारंग यांना एका दुकानात नेले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा, दंगल माजवण्याचा गुन्हा 7 जणांवर दाखल केला आहे. यामध्ये भारतीय किसन युनियनच्या सिद्धूपूरचे अध्यक्ष सुखदेव सिंग बुरा बुजर यांचा समावेश आहे. तसेच 200 अज्ञात व्यक्तिंविरोधआतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला 4 महिने झाले आहेत. शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. पण केंद्र सरकारने कायदे रद्द केलेले नाहीत. तसेच सरकारने शेतकऱ्यांसोबत कोणताही संवादसुद्धा ठेवलेला नाही. यापार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. भाजपचे उपाध्यक्ष प्रवीण बन्सल यांनाही शेतकऱ्यांनी बर्नाला इथे घेराव घातला होता. यानंतर बन्सल यांना काही काळ सर्कीट हाऊसमध्ये थांबावे लागले होते. दरम्यान अकाली दलाने या हल्ल्यांचा निषेध केला असून अशाप्रकारांमुळे शेतकऱ्यांचे आंदोलन बदनान होते आहे, असे मत व्यक्त केले आहे.

Updated : 28 March 2021 9:18 AM IST
Next Story
Share it
Top