Home > News Update > राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यातील बर्ड फ्लूच्या साथीबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे तसेच नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचीही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, खबरदारी घेण्याचे आवाहन
X

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती न बाळगता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्षांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यातून होत नाही. त्यामुळे हे पदार्थ खाऊ शकतात, असेही सुनील केदार यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवा व अकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

*बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी हे करा*

1. पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेशी संपर्क येणार याची खबरदारी घ्या

2. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.

3. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.

4. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.

5. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा.

6. पूर्ण शिजवलेले मांस खा.

7. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

*बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी हे करु नका*

1.कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.

2. अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.

3. आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.

4. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे दिसल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी नागरीकांना केले आहे.

Updated : 17 Jan 2021 1:07 AM GMT
Next Story
Share it
Top