Home > News Update > देशात पहिल्यांदाच असे घडले, केजरीवाल यांचा मोठा निर्णय

देशात पहिल्यांदाच असे घडले, केजरीवाल यांचा मोठा निर्णय

देशात पहिल्यांदाच असे घडले, केजरीवाल यांचा मोठा निर्णय
X

५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पंजाबमध्येही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवरुन राजकीय आऱोप प्रत्यारोप रंगले आहेत. तर दुसरीक़डे आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. निवडणूकपूर्व चाचण्यांमध्येही पंजाबमध्ये 'आप'ला बऱ्यापैकी यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी पंजाबमध्ये मोठा आणि ऐतिहासिक निर्णय़ घेतला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'तर्फे मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचा चेहरा असावा, असे जनतेला वाटते आणि त्यासाठी त्यांनी उमेदवाराचे नाव सूचवावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. त्यासाठी केजरीवाल यांना एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. 7074870748 या नंबरवर लोकांनी फोन करुन किंवा मेसेज करुन आपल्या आवडीच्या उमेदवाराचे नाव द्यावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

"पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी कुणी बसावे याचा निर्णय आपण घेण्यापेक्षा जनेतेच्या मनातील व्यक्ती मुख्यमंत्री झाली पाहिजे" अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली आहे. चंदीगडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "देशात १९४७ नंतर बहुधा पहिल्यांदाच असे घडत आहे की एखादा राजकीय पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यासाठी जनतेचे मत आजमावत आहे. नागरिकांनी 7074870748 या मोबाईल नंबरवर वॉट्सपद्वारे किंवा फोन कॉल करुन १७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांची नावं द्यावी" असे आवाहन त्यांनी केले आहे. "भगवंत मान हे आपल्याला लहान भावासारखे आहेत, त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे मलाही वाटते, पण कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल ते जनतेला ठरवू द्यावे" अशी भूमिका मान यांनी मांडल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

"पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत येणार हे निश्चित आहे. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेची आणि राज्यातील ३ कोटी जनतेच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेऊ" असे देखील केजरीवाल यांनी सांगितले आहे.

Updated : 13 Jan 2022 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top