Home > News Update > Agnipath scheme : 'अग्निपथ' योजनेची आग दक्षिणेतही, तेलंगणमध्ये गोळीबारात एक मृत्यू

Agnipath scheme : 'अग्निपथ' योजनेची आग दक्षिणेतही, तेलंगणमध्ये गोळीबारात एक मृत्यू

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला युवकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. त्यातच उत्तर भारतात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण दक्षिण भारतातही पसरले आहे. तर देशात अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरूच आहे.

Agnipath scheme : अग्निपथ योजनेची आग दक्षिणेतही, तेलंगणमध्ये गोळीबारात एक मृत्यू
X

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ लष्कर भरती आणि प्रशिक्षणासाठी अग्निपथ या नव्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. मात्र या योजनेला देशभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. तर उत्तर भारतातील अनेक बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशसह सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतातही पसरले आहे. त्यातच तेलंगणामध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अग्निपथ या योजनेविरोधात देशभरात युवकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. त्यातच बिहारमध्ये युवकांनी एकत्रित येत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान संतप्त युवकांनी रेल्वेच्या इंजिनला आग लावली. त्यानंतर अनेक ठिकाणी अग्निपथ या योजनेविरोधात संतापाची लाट उसळल्याची पहायला मिळाली.

भाजपचे शासन असलेल्या उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणासह झारखंड आणि दिल्लीतही या योजनेविरोधात संतप्त युवकांनी आंदोलन केले. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेची कमाल वयोमर्यादा ही 21 वर्षावरून 23 वर्षे केली. मात्र त्यानंतरही युवकांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान राजनाथ सिंह यांनी लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील युवक आणखीच संतप्त झाला आहे. तर उत्तरेतील आंदोलनाचे लोण आता दक्षिण भारतातसह ईशान्य भारतातील आसाममध्येही पोहचले आहे.

तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात झालेल्या मोठा हिंसाचार झाला. यादरम्यान तेलंगणाच्या सिकंदराबाद येथे आंदोलकांविरोधात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

काय आहे अग्निपथ? (What is Agnipath)

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत पत्रकार परिषद घेऊन अग्नीपथ या योजनेची घोषणा केली. तसेच ही योजना भारतीय लष्कराला तरूण चेहरा देईल, असं मत राजनाथ सिंह यांनी केले. त्याबरोबरच या योजनेंतर्गत भारतीय तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत 'अग्नीविर' म्हणून काम करता येणार आहे. तर या योजनेमुळे व्यापक स्तरावर देशाला प्रतिभावान सैनिक मिळतील, असं मत या योजनेची घोषणा करताना व्यक्त केले.

अग्निपथ योजनेत मोबदला काय मिळणार? (What is Benefit of Agnipath)

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 46 हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी वयोमर्यादा ही 17 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असेल असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र युवकांकडून होणाऱ्या विरोधानंतर आता वयोमर्यादा 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी 30, दुसऱ्या वर्षी 33 तर तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मोबदला मिळणार आहे. तर यानंतर अग्निविराला 11 लाख 71 हजार रुपये करमुक्त सेवानिधी आणि सेवाकाळात 48 लाख रुपयांचे विमाकवचही मिळणार आहे, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी केली.

या योजनेवर आक्षेप काय? ( What is Objection on Agnipath Scheme)

  • केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेत चार वर्षे सेवेनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
  • काही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून लष्करी सेवेत जाण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून फक्त चार वर्षेच सेवेची संधी मिळणार असल्याने युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
  • या योजनेमुळे गरीब कुटूंबातील विद्यार्थी पैशासाठी या योजनेत सहभागी होतील. मात्र या योजनेमुळे त्यांच्या उच्च शिक्षणावर परिणाम होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून उच्चवर्णिय आणि बहुजन दरी निर्माण करण्याचा डाव असल्याची टीकाही केली जात आहे.
  • सैनिकांच्या पेन्शनचा ताण सरकारवर येत असल्याने पेन्शनचा विषयच संपून टाकण्यासाठी सरकार ही चाल खेळत असल्याची टीकाही यावर केली जात आहे.
  • ही योजना बेरोजगारी निर्माण करण्याचा कारखाना बनेल, असाही आक्षेप या योजनेवर घेतला जात आहे.

देशभरात तीव्र पडसाद (Violence spread in many states)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेचे बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, आसाम, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. तर या विरोधाचे आणि हिंसाचाराचे लोण देशातील इतर राज्यांमध्येही पसरण्याचा धोका आहे.

अग्निपथ योजनेला विरोध करत बिहारमध्ये युवकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. तर रेल्वेच्या इंजिनला तसेच डब्यांना आग लावण्यात आली. त्याबरोबरच रेल्वेची तोडफोडही करण्यात आली. तर उत्तरप्रदेशातही युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केला. त्यामुळे या विरोधाचे लोण देशभर पसरण्याचा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारने दोन वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही युवकांचा विरोध कायम आहे.

भाजप कार्यालये आणि नेत्यांना लक्ष

अग्निपथ योजनेविरोधात सुरू झालेल्या आंदोलकांनी बिहारमध्ये भाजप नेते आणि भाजपच्या कार्यालयांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.

राहूल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

लोकांना नेमकं काय हवं तेच मोदी सरकारला समजत नाही. कारण अग्निपथ योजना युवकांनी नाकारली, कृषी कायदे शेतकऱ्यांनी नाकारले, नोटाबंदी अर्थतज्ज्ञांनी नाकारली, जीएसटी व्यापाऱ्यांनी नाकारला, असा टोला राहूल गांधी यांनी लगावला.

दोन दिवसात भरती प्रक्रीयेला होणार सुरूवात

अग्निपथ योजनेंतर्गत दोन दिवसात भरती प्रक्रीयेला सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच भरती झालेल्या उमेदवारांना डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण देण्यात येण्याचे लक्ष्य लष्कराने ठेवले आहे. तर हवाई दलात भरतीसाठी 24 जूनपासून भरती प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांनी दिली.

आंदोलनाचा फटका रेल्वे सेवेला

अग्निपथ योजनेवीरोधात सुरू असलेल्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे 200 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे.

Updated : 18 Jun 2022 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top