अर्णब गोस्वामींना प्रश्न विचारणाऱ्या कुणाल कामरांना विमानबंदी
X
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमान प्रवासात प्रश्न विचारणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा यांना इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाईसजेट यांनी ६ महिने विमानप्रवास बंदी केलीये. कुणाल कामरा यांनी विमानात अर्णब गोस्वामींना थेट सवाल करत त्यांच्या पत्रकारितेवर टीका केली होती. "गोस्वामी भित्रे आहेत” अशी टीका कामरा यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली आहे. पण ही बंदी घालण्यात आल्यानंतर कामरा पंतप्रधान मोदींवर टीका केलीये. ‘’सहा महिन्यांच्या निलंबनासाठी मी आभारी आहे. मोदीजी एअर इंडिया कदाचित कायमच निलंबित करून टाकतील."
तर दुसरीकडे "कामरा यांची वागणूक चुकीचीच होती. अशा वागणुकीपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी एअर इंडियामध्येही कुणाल कामरा यांना पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास करता येणार नाही," असं म्हणत एअर इंडियाने कामरा यांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
या बंदीवर कामरा यांनी आपल्या खास कॉमेडी अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.
“एकदा एअर इंडियाने जाताना माझ्याकडील ‘लगेज’चं वजन चार किलोग्रॅम अधिक भरलं, तुमची मशिन बंद होती आणि माझ्याकडे रोख पैसे नव्हते. कर्मचारी जाऊ द्या म्हणाला. पण तुमची कंपनी तोट्यात आहे, मी पैसे देऊनच जाईन असं मी त्यांना म्हणालो. माझ्याकडून पैसे कसे घ्यायचे याची पर्यायी व्यवस्था करेपर्यंत मी थांबलो होतो….पण अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”I had 4kgs excess luggage once, your card machine wasn’t working & I didn’t have cash...
He said “Jane do sir”
I said “Nahi, aapki airline debt main hai, Main paise de ke jaunga.”
I waited till he could figure how to take my money.
Acha Sila diya tune mere pyaar ka... https://t.co/lLcLAhvFTR
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020
असं ट्विट त्यांनी केलं आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर कामरा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
त्या विमानात नेमकं काय झालं?
"मी लखनौला जाणाऱ्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी संवाद साधण्याची विनंती केली. आधी त्यांनी फोनवर बोलत असल्याचं भासवलं. मी त्यांची वाट पाहिली. मला त्यांच्या पत्रकारितेबद्दल काय वाटतं, याबद्दल एक स्वगतही सादर केलं. माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. मी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे ते म्हणाले. टेक ऑफ झाल्यानंतर मी त्यांच्याकडे पुन्हा गेलो आणि बोलू शकतो का, अशी विचारणा केली. ते काहीतरी पाहत असल्याचं ते म्हणाले. त्यावेळी 'रिपब्लिक टीव्ही'चे लोक प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर जे करतात तेच मी केलं. मला त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नाही आणि मी माफी मागणार नाही," अशी भूमिका कामरा यांनी मांडली आहे.