मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्या ट्रोलर्सना शबाना आझमी यांचे उत्तर
X
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम द्वेष आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या ट्रोल गँगला अभिनेत्री शबाना आझमी यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. सध्या देशात धर्मसंसदेच्या माध्यमातून मुस्लिमांविषयी द्वेष पसरवणारी विधाने केली गेली आहेत. पण आता स्वयंसेवक असल्याचा दावा करणाऱ्या एका ट्विटर युजरने केलेले ट्विट खोटे असल्याचे उत्तर शबाना आझमी यांनी दिले आहे.
Tattvam Asi (तत्त्वम् असि!) @Brahamvakya या वापरकर्त्याने ट्विट केले आहे, "जावेद अख्तर यांचे पणजोबा मौलाना फजल हक खैराबादी यांनी १८५५मध्ये हनुमान गढी मंदिर पाडण्याचा फतवा काढला होता, पण ब्रिटीशांनी ते मंदिर वाचवले" असे ट्विट केले आहे.
त्याच्या या ट्विटला शबाना आझमी यांनी उत्तर दिले आहे.
"हे धादांत खोटे आहे. फजल हक हे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांना ब्रिटीशांनी काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली होती. अंदमानमध्येच त्यांचे निधन झाले आणि आजही त्यांची समाधी तिथे आहे आणि त्यांना हिरो म्हणून संबोधण्यात आले आहे. तुम्हाला त्यांच्याविषयी अधिका माहिती हवी असेल तर 'बागी हिंदुस्थान' पुस्तक वाचा"
या शब्दात शबाना आझमी यांनी उत्तर दिले आहे.
Tattvam Asi (तत्त्वम् असि!) @Brahamvakya या ट्विट हँडलवरुन पुरोगामी मुस्लिम बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यामध्ये जावेद अख्तर, शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांचा समावेश आहे. शबाना आझमी यांच्या या ट्विटवर काही युजर्सने त्यांचे समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. यामध्ये एका हँडलरने खोचक प्रश्न विचारला आहे. "त्यांनी ब्रिटीशांची माफी मागून सुटका करुन घेतली नाही का?" असा सवाल विचारला आहे आणि "थांबा, अरे ते तर सावरकर होते" असा टोला लगावला आहे.







