शरीरावरील टॅटूमुळे अपहरण आणि खुनाची झाली उकल
X
उल्हासनगर : चिंचपाडा परिसरात असणाऱ्या गावदेवी तलावात तरंगलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख टॅटू वरून पटली आणि हा मृतदेह नवीमुंबईचे रबाळे मधील नाका कामगाराचा असून त्याचे अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
सोमवारच्या रात्री तलावात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानी घटनास्थळाकडे धाव घेतली. याप्रकरणी प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आला होता. मयताचे शरीरावर टॅटू गोंदलेला असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी सर्व पोलिसांना पाठवली होती. ह्या माहितीच्या आधारे हा मृतदेह चंद्रकांत शेलार ह्या नाका कामगाराचा असून तो नवी मुंबई येथील रबाळे येथून हरवला असल्याचे समोर आले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा अज्ञात इसमांविरोधात दाखल करण्यात आला होता. मात्र टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली आणि दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. साजन मारूती कांबळे आणि डिवाईन तेलेस घोन्साळवीस असे अरोपींचे नाव आहे.
मृताची पत्नी आणि आरोपी साजन यांच्यात प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून नेहमी भांडण होत होत, त्यामुळेच ही हत्या झाली असेल, अशी प्राथमिक माहिती आहे, पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.






