Home > News Update > इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू; ७५ जणांना बाहेर काढण्यात यश; बचावकार्य युध्दपातळीवर सुरू

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू; ७५ जणांना बाहेर काढण्यात यश; बचावकार्य युध्दपातळीवर सुरू

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू; ७५ जणांना बाहेर काढण्यात यश; बचावकार्य युध्दपातळीवर सुरू
X

रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जणांना बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाखांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जी आपातकालीन यंत्रणा आहे, मग त्यात एसडीआरएफ आहे. एनडीआरएफ आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आपतकालीन यंत्रणा अलर्ट आहेत. जिथे जिथे गरज असेल, तेथील लोकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांची गैरसोय, त्रास, जीवितहानी होणार नाही, याच्या सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Updated : 20 July 2023 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top