कृषि विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक
X
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने (AIKSCC) च्या नेतृत्त्वात आज संसदेने मंजूरी दिलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात भारत बंदची हाक दिली आहे.
शेतकऱ्यांचा हमीभावाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. त्यानंतर मात्र आमच्या हातातील दगडांमुळे तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटना आज (25 सप्टेंबर) देशभरातील या विविध शेतकरी संघटनांच्या सोबत महाराष्ट्रात आंदोलन करत आहे.
संसदेने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 या विधेयकांना मंजूरी दिली आहे.
मात्र, या विधेयकांमुळे बाजार समित्याचं अस्तित्व धोक्यात येऊन शेती उद्योगपतींच्या हाती जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे...
या आंदोलनाचे पडसाद आत्तापर्यंत पंजाब आणि हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते. मात्र, आज हे आंदोलन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहार या राज्यात देखील पाहायला मिळत आहे.
कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव कसे मिळणार? याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही. असं म्हणत राजू शेट्टी यांनी या बिलाला विरोध केला आहे.