दुष्काळग्रस्त भागातील तरूण शेतकरीही हतबल
X
दुष्काळग्रस्त भागातील तरूण शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रची टीम पोहोचली लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात. सततच्या दुष्काळामुळं इथला तरूण शेतकरीही हताश झाला आहे. वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठीही काहीजण शेती करत आहेत. शेतीसाठी जेवढी गुंतवणूक केली त्यापेक्षा कमी उत्पन्न मिळत असल्यानं दिवसेंदिवस इथला शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचत चालला आहे. अशा परिस्थितीत अद्यापही सरकारनं त्यांची दखल घेतलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
ब्रह्मानंद मोरे हा निलंगा तालुक्यातील तरूण शेतकरी. १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं.
maxkisan
सततच्या दुष्काळामुळं वडिलांना ब्रह्मानंदला पुढचं शिक्षण देणं शक्य नव्हतं. दुष्काळाशी दोन हात करतच ब्रह्मानंदच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर ब्रह्मानंदनं शेती करायला सुरूवात केलीय. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यालाही दुष्काळाचा सामना करावा लागतोय. कमी पाण्यात उत्पादन मिळवण्यासाठी म्हणून ब्रह्मानंदन टोमॅटोची शेती करतोय. साधारणतः टोमॅटोची शेती करण्यासाठी एकरी १ लाख रूपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, त्यातुलनेत एकरी ७० हजार रूपयांचं उत्पन्न मिळू लागलंय. त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीत शेती करूनही त्यात नुकसान सहन करावं लागतंय. पाण्याचा योग्य वापर आणि उत्पन्न वाढीसाठी ब्रह्मानंदनं मल्चिंग पेपरचा वापर केला. परंतू, पाणीच नसल्यानं मल्चिंगचाही फारसा उपयोग झाला नसल्याचं ब्रह्मानंद सांगतो.
maxkisan
वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं ?
maxkisan
दुष्काळी परिस्थितीत शेती करण्यासाठी ब्रह्मानंदच्या वडिलांनी बँकेतून बोअरवेलसाठी कर्ज घेतलं होतं. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची पातळीच घसरत चाललीय, त्यामुळं बोअरलाही पाणी नाही. परिणामी शेतातलं उत्पन्न कमी झालं. उत्पन्नचं कमी असल्यान बँकेचे हप्तेही थकलेले आहेत. अशा परिस्थितीत शेती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत ब्रह्मानंद सध्या आहे. बँकेकडून सातत्यानं कर्जाच्या परतफेडीसाठी संपर्क केला जातोय.