Home > मॅक्स रिपोर्ट > मोदी शहांना युवा कार्यकर्त्यांचे इतके भय का वाटते?

मोदी शहांना युवा कार्यकर्त्यांचे इतके भय का वाटते?

मोदी शहांना युवा कार्यकर्त्यांचे इतके भय का वाटते?
X

"स्वच्छ आणि सुंदर वसुंधरा" हेच ध्येय असलेल्या 21 वर्षाच्या तरुण मुलीला अटक करण्याची एव्हढी निकड भारत सरकारला का म्हणून वाटावी? आपल्या वैयक्तिक हितापलीकडे जाऊन संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार आपल्या तरुणांनी करावा. असे आपल्या देशातील सर्वांना वाटायला नको काय? स्वतःचे आणि स्वतःच्या देशबांधवांचे भवितव्य उज्वल व्हावे. यासाठी झटणाऱ्या एका तरुणीची गठडी वळण्यासाठी सरकारने दिल्लीहून खास पोलिसपथक धाडून बंगळुरूमधील तिच्या घरातून तिला असे निष्ठुरपणे पकडून थेट दिल्लीत आणून तुरुंगात का म्हणून टाकावे? जागतिक तापमान बदलासंबंधी जनमत जागृती करणारी एखादी चळवळ आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देणाऱ्या काही ट्विटस यामुळे आपल्या बलाढ्य आणि स्वघोषित आत्मनिर्भर भारत सरकारला असा काय बंडाचा धोका पोहोचू शकतो?

दिशा रवीच्या अटकेची बातमी वाचून माझ्या एका मित्राने मला हेच प्रश्न विचारले. अशा स्वरुपाचेच प्रश्न देशभरातील असंख्य घरात नक्कीच विचारले गेले असतील. या तरुण मुलीची मनमानी अटक आणि तिला फर्मावलेली पोलीस कोठडी या गोष्टी प्रथम दर्शनीच तर्क, विवेक आणि सर्वसामान्य व्यावहारिक बुद्धीला पटण्यासारख्या नाहीत. लोकशाही राज्यघटनेद्वारा स्थापित कायद्याच्या राज्यात कोणत्याही सरकारने अशी कृती करता नये. पण आपल्या भारत सरकारने ती केली. यामागे कोणते कारण असेल?

आपल्या आईबरोबर राहात असलेल्या बेंगळुरूच्या या तरुण आदर्शवादी मुलीला कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ताब्यात घेऊन विमानात बसवून दिल्लीला आणण्यात येते आणि पाच दिवसाच्या कठोर तपासणीला तिला तोंड द्यावे लागते. हे का केले गेले याची एकंदर सहा कारणे मी आपणासमोर ठेवू इच्छितो. मोदी शहा राजवटीचा 2001 ते 2014 दरम्यानचा गुजरातेतील इतिहास आणि त्यानंतरची केंद्रातील त्यांची कार्यपद्धती हा माझ्या या मांडणीचा आधार आहे.

पहिले कारण हे की मोदी शहा राजवटीला कोणत्याही स्वतंत्र विचाराचे भय वाटते. भारतीयांनी कसे आज्ञाधारक, गतानुगतिक, राजनिष्ठ, राजवटनिष्ठ आणि 'महान आणि द्रष्ट्या' नेत्यांशी भक्तिलीन असावे!

आपल्या धोरणांची किंवा कृतींची गांभीर्याने, वस्तुनिष्ठ, समग्र चिकित्सा करण्याची मुभा कुणालाही नसावी. हेच खरे म्हणजे योग्य! पण झालेय असे की 2014 च्या मे महिन्यापासून लोकशाहीने दिलेल्या विविध अधिकारांचा मोठ्या प्रमाणात संकोच केला गेला असला तरी अद्याप ते पुरते नष्ट झालेले नाहीत. तुरळक प्रमाणात वृत्तपत्रीय आणि माध्यमं स्वातंत्र्य अद्याप टिकून आहे. झपाट्याने आक्रसत असलेल्या नागरी समाजात आणि बी जे पी च्या ताब्यात नसलेल्या काही मोजक्या मोठ्या राज्यात ते अजून आपली धुगधुगी टिकवून आहे.

राजकारणात आणि नागरी समाजातही मोदीशहा राजवटीचा प्रभाव देशव्यापी आहे. पण नुसता प्रभाव असण्याने त्यांचे समाधान होत नाही. त्यांना संपूर्ण देश आपल्या कह्यात हवा आहे. या महत्वाकांक्षेपोटी ते लोकसभेतील चर्चांना कात्री लावतात, राज्यांचे अधिकार मर्यादित करतात आणि माध्यम स्वातंत्र्याचा गळा दाबतात.

पंतप्रधानांनी गेल्या साडेसहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेणे टाळलेले आहे आणि गोदी मीडियाला मात्र, सर्व प्रकारे बळ पुरवलेले आहे. सरकारच्या कामाची माध्यमांकडून कमीत कमी चिकित्सा व्हावी. हा आपला हेतू त्यांनी याद्वारे साध्य केला आहे. पण अजून तरी अशी चिकित्सा ते पूर्णतः थांबवू शकलेले नाहीत. आणि म्हणून न्यूजक्लिक सारख्या स्वतंत्र साईट्सवर आणि स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांवर आज हल्ले होत आहेत.

दिशा रवीच्या अटकेमागचे दुसरे कारण हे की, मोदी शहा राजवटीला कुठल्याही स्वतंत्र विचाराची धास्ती वाटत असली तरी विशेषतः तरुण मुलेमुली असे विचार व्यक्त करू लागली की ते जास्तच घाबरतात. धार्मिक बहुलता, जात व लिंग या संदर्भातील समान न्याय, लोकशाही पारदर्शकता आणि पर्यावरणीय संतुलन - थोडक्यात संघ परिवारापेक्षा वेगळ्या आणि अनेकदा विरोधी आदर्शांनी भारलेल्या विशीतिशीतील या तरुणांकडे प्रचंड ऊर्जा आहे.

आपल्या भूमीविषयीच्या आपल्या आकांक्षा फलद्रुप करण्यासाठी त्यांच्याकडे खूप अवकाश आहे. वय त्यांच्या बाजूला आहे. म्हणून तुरुंगातच डांबले पाहिजे त्यांना. शासकीय सत्तेचा आणि विधिवत प्रक्रियेचा प्रसंगी दुरुपयोग झाला तरी बेहत्तर. दिशाची अटक म्हणजे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या अनेक आदर्शवादी, आत्मलोपी भारतीय तरुणांच्या आजवर झालेल्या अटक शृंखलेतीलच आणखी एक कडी आहे.

स्वतःला स्वतंत्र विचारसरणीचे मानणाऱ्या प्रौढ भारतीयांपेक्षा या आदर्शवादी तरुणांचाच संघ परिवाराच्या अंगीकृत कार्याला जास्त धोका आहे. खरे तर सगळ्या विरोधी पक्षांपेक्षाही या तरुणांचाच संघ परिवाराला अधिक धोका आहे. दिशाच्या अटकेनंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले,

"इंदिरा गांधींनी आणीबाणीत विरोधी नेत्यांना अटक केली. मोदी विरोधी नेत्यांना अटक करणार नाहीत. त्यांच्यापैकी बहुतेकांची फारशी विश्वासार्हताही उरलेली नाही किंवा जनतेवर त्यांचा फारसा प्रभावही नाही हे मोदी जाणून आहेत. म्हणून ते लोकशाहीसाठी लढणाऱ्या सच्च्या तरुण कार्यकर्त्यांना अटक करताहेत. ही मोदींनी आणलेली वेगळ्या तऱ्हेची आणीबाणी आहे."

विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना धाक किंवा लालूच दाखवून बीजेपीत यायला भाग पाडले जाऊ शकते. या तरुण कार्यकर्त्यांपुढे या मात्रा चालत नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचार, वशिलेबाजी, किंवा घराणेशाहीच्या आरोपांचे दडपण लादता येत नाही. निखिल वागळे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मानसिक आणि विचारसरणीच्या पातळीवर संघ परिवार राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा उमर खलिद किंवा नताशा नरवालला किती तरी अधिक घाबरतो.

मोदी शहा राजवटीने दिशा रवीला अटक करण्यामागचे तिसरे कारण आहे. माध्यमांचे मथळे काबीज करण्याची त्यांची अनिवार गरज. सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या प्रकारे हाताळले आणि विख्यात परकीय व्यक्तींच्या चारदोन ट्विट्सवर त्यांनी जी आततायी प्रतिक्रिया दिली त्यावरून लोकांचे लक्ष आता दुसरीकडे वळवायचे तर काही कट्टर राष्ट्रवादी गडद रंगभरणी करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी तीन खलपात्रांनी रचलेला हा एक गंभीर आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा केला. ही तीन पात्रे होती काहीच काम न उरलेले कॅनडातील खलिस्तानी, स्वीडनमधील एक टीनेजर मुलगी आणि बेंगळुरूमधील आता आता सज्ञान झालेली आणखी एक मुलगी. आता याबाबतची हवी तीच तेव्हढी वस्तुस्थिती पोलीस निवडून बाहेर पेरतील. गोदी मीडिया आणि भाजपाचा आय टी सेल त्या निवडक गोष्टींचीच टिमकी वाजवत राहील. परिणामी राजधानीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे हाल निदान काही काळ तरी चर्चेत राहणार नाहीत. किमान हीच सरकारची अपेक्षा असेल.

मोदी शहा राजवटीने माझ्या गाववालीला अटक करण्याचे चौथे कारण हे आहे की हे लोक मनातून कट्टर परद्वेष्टे आहेत. अगदी स्वदेशी नाव असलेली एक भारतीय नारी गोऱ्या कातडीच्या आणि ख्रिश्चन धर्मीय पर्यावरण कार्यकर्तीच्या नित्य संपर्कात राहते ही गोष्ट त्यांच्या विकृत आणि संकुचित राष्ट्रवादी वृत्तीला सहन करवत नाही. त्यांच्या मते दिशा रवी असे शुद्ध भारतीय नाव असलेल्या मुलीने आपले 'काळे पाणी' उल्लंघून परदेशी संपर्क साधायचाच असेल तर फारतर तो न्यू यॉर्क किंवा वॉशिंग्टन येथील भाजप मित्रांच्या गटाशी साधावा. हे काय भलतेच?

सर्वसाधारण तरुणांना योग्य ती धडकी भरवणारा संदेश मिळावा हे या एकवीस वर्षीय मुलीला मोदी शहा राजवटीने अटक करण्याचे पाचवे कारण होय. केवळ तरुणांनाच नव्हे, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा. सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारे नुसते ट्विट केल्याबद्दल सरकार असा निष्ठुर सूड उगवत असेल तर मग आपली करिअर आणि परीक्षा यांच्या पलीकडे जाऊन निदान थोडा वेळ का होईना देशासाठी, समाजासाठी काही करावे असे मनापासून वाटणारे तरुण सुद्धा तसे करायला धजावणार नाहीत. त्यांचे आईवडील, काकामामा, आत्यामावश्या आणि थोरली चुलतमावस भावंडे सुद्धा त्यांना या समाजमाध्यमांपासून, सभाबिभांपासून चार हात दूर रहायलाच सांगतील. त्यांच्या शाळाकॉलेजांतील शिक्षक, प्राचार्य त्यांना हाच सल्ला देतील. आणि मोदी शहा ज्यासाठी तळमळत आहेत ती आज्ञाधारकता आणि गतानुगतिकता अशा रीतीने साऱ्या तरुणवर्गात खोलवर झिरपत राहील. निदान मोदी शहांना तशी आशा तरी बाळगता येईलच.

मोदी शहा राजवट एकूणच तरुण कार्यकर्त्यांची जी मुस्कटदाबी करत आहे तिला वर दिलेली त्यांची पाच उद्दिष्टे कारणीभूत आहेत. सहावे कारण मात्र फक्त या विशिष्ट व्यक्तीपुरते मर्यादित आहे. दिशा रवीच्या फ्रायडेज फॉर द फ्युचर (FFF) या गटाने भारत सरकार करत असलेल्या पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनावर आपले सारे लक्ष केंद्रित केले आहे. न्यूजमिनीट ही एक उत्कृष्ट वेबसाईट आहे. ती म्हणते, " केंद्र सरकार इतके चिडलेय कारण FFF ने लोकसहभागाचे आणि लोकमान्यतेचे महत्व कमी करून प्रकल्पाला कार्योत्तर मंजुरी देऊ करणाऱ्या पर्यावरण प्रभाव आकलन अधिसूचना 2020 ( EIA) च्या ड्राफ्ट विरुद्ध अत्यंत खंबीर भूमिका घेतलेली आहे.

EIA ला कमजोर बनवणे ही गोष्ट सामाजिक न्याय किंवा पर्यावरणीय स्थैर्य यापेक्षा बड्या कंपन्यांच्या हितालाच प्राधान्य देण्याच्या मोदी सरकारच्या व्यापक धोरणाला अनुसरूनच आहे. मध्य भारतात सुधा भारद्वाज आणि स्टॅन स्वामी यांनी आदिवासींची जमीन आणि जंगले सरकारच्या बगलेतील प्रवर्तकांच्या खाणकंपन्यांना देण्याला कडाडून विरोध केला होता. या विरोधाची भयानक किंमत आज हे दोघेही बंदिवास सोसत भोगत आहेत. आता तो भोगण्याची पाळी बेंगळुरूच्या दिशा रवीची आहे.

भारत सरकार ही काय चीज आहे हे लक्षात घेता अटक करण्यासाठी त्यांनी दिशाचीच निवड केली याचे आणखी एक संभाव्य कारण असू शकते. या स्तंभात पूर्वी उल्लेखलेल्या इतर आंदोलकांप्रमाणे दिशाला राजकीय विद्यार्थी चळवळीचा पूर्वानुभव नाही, त्यामुळे पोलिसांच्या पाशवी चौकशीपुढे टिकाव धरण्याची तिची कोणतीही पूर्वतयारी नाही हे ते कारण होय. या घडीला दिल्ली पोलिसांकडून तिची काय अवस्था केली जात असेल याबद्दल म्हणूनच रास्त भीती वाटते.

मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे कायद्यानुसार चालणारे कोणतेही सरकार असले वर्तन करणार नाही. पण मोदी शहा राजवटीच्या मनात लोकशाही प्रक्रियेविषयी एक प्रकारची तुच्छता आहे. या सरकारकडे मानवता, सौजन्य, सभ्यता, पारदर्शकता या गोष्टी नावालाही नाहीत. सर्वंकष सत्ता या एकाच ध्येयाशी ते बांधील आहे. संपूर्ण राजकीय, वैचारिक, आणि वैयक्तिक प्रभुत्व हीच त्यांची आकांक्षा आहे. राज्यघटनेवर हात ठेवून आपल्या अधिकारपदाची शपथ घेतलेली माणसे रोजच्या रोज घटनेच्या प्रस्तावनेत व्यक्त झालेल्या भावनांच्या विरुद्ध वर्तन करत आहेत. देशातील काही तरुणतरुणी ही घटनात्मक मूल्ये उराशी बाळगून त्यांचा सन्मान करण्याची मागणी करतात तेव्हा त्यांनाच पकडून तुरुंगात टाकणे हे या सरकारचे त्यावरचे उत्तर आहे.

भाषांतर: अनंत घोटगाळकर

From NDTV शिते

लेखक: रामचंद्र गुहा

(रामचंद्र गुहा हे बेंगळुरूस्थित इतिहासकार आहेत. एन्व्हायर्नमेंटलिझम : अ ग्लोबल हिस्टरी आणि गांधी द इयर्स दॅट चेंजड द वर्ल्ड आदी पुस्तकांचे ते लेखक आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तिगत मते आहेत.)

https://www.ndtv.com/opinion/why-modi-and-shah-fear-young-activists-by-ramachandra-guha-2371727

Updated : 20 Feb 2021 3:08 PM GMT
Tags:    
author-thhumb

रामचंद्र गुहा

Ramachandra Guha is an Indian writer whose research interests include environmental, social, economics, political, contemporary and cricket history. He is also a columnist for The Telegraph, Hindustan Times and Hindi Daily Newspaper Amar Ujala.


Next Story
Share it
Top