श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे ‘महाभारत’ लिहिले - उद्धव ठाकरे
X
श्रीकृष्ण जन्मदिनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप आमदार राम कदम चांगलेच वादात अडकले आहेत. त्यांच्यावरती सध्या सगळीकडूनच टिकेचे वार केले जात आहेत. याबाबत त्यांना पक्षातून निलंबित करावे अशी मागणी केली जात आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून देखील राम कदमांना चांगलीच खरीखोटी सुनावली आहे.
“श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे ‘महाभारत’ लिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही. एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत.” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच धार्यावर धरले आहे. महाराष्ट्र धर्म बुडाला आहे तो पापी औरंग्यामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे. “भाजपचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे. दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रुबाबात माईकवरून जाहीर केले की, ‘‘कोणती मुलगी आवडली असेल तर फक्त मला येऊन सांगा. त्या मुलीस उचलून तुमच्या हवाली करतो.’’ ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे? आई-भगिनी, शेतकरी, सीमेवरील जवानांच्या पत्नींबाबत घाणेरडय़ा शब्दांत उद्धार करणारी जमात भारतीय जनता पक्षात रुजली आहे. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना मस्तवाल व साले लबाड म्हणाले. पंढरपूरचे भाजप आमदार प्रशांत परिचारकांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या बायकांबाबत घाणेरडे व हलकट विधान केले. त्या सगळय़ांवर आमदार कदम यांनी हरामखोरीचा कळस चढवला आहे. दुसऱ्यांच्या बायका, लेकी, सुना पळवून आणू असे सांगणारा आमदार ज्या पक्षात आजही आहे त्यांना शिवरायांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही. सरकार शिवरायांचे उंच स्मारक समुद्रात बांधत आहे. मात्र भाजप आमदाराच्या कालच्या विकृतीने शिवरायांचाच अपमान झाला. कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने खणा-नारळाची ओटी भरून परत पाठवणारे शिवाजी महाराज कोठे व राज्याच्या विधानसभेत घुसलेले हे हरामखोर कोठे? ”असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.