Home > मॅक्स रिपोर्ट > दोन एकरात शेतकऱ्यांने पिकवला सेंद्रिय पद्धतीने गहू

दोन एकरात शेतकऱ्यांने पिकवला सेंद्रिय पद्धतीने गहू

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे द्राक्ष बागांच्या पिकाचे माहेर घर समजले जाते. येथे द्राक्ष पिकाची वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. पण याच द्राक्ष पिकाच्या पट्यात येथिल शेतकरी राकेश देशमुख यांनी दोन एकर शेती क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवला आहे. रासायनिक गव्हापेक्षा सेंद्रिय पद्धतीच्या गव्हाचे पीक चांगल्या प्रकारे आले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

दोन एकरात शेतकऱ्यांने पिकवला सेंद्रिय पद्धतीने गहू
X

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे द्राक्ष बागांच्या पिकाचे माहेर घर समजले जाते. येथे द्राक्ष पिकाची वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. पण याच द्राक्ष पिकाच्या पट्यात येथिल शेतकरी राकेश देशमुख यांनी दोन एकर शेती क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवला आहे. रासायनिक गव्हापेक्षा सेंद्रिय पद्धतीच्या गव्हाचे पीक चांगल्या प्रकारे आले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...एकीकडे रासायनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असताना सेंद्रिय पद्धतीची शेती दुर्मिळ होत चालली आहे. कमी कालावधीत पीक काढण्याच्या नादात शेतकरी पिकावर रासायनिक फवारण्या व रासायनिक खतांचा वापर करत आहेत. या रासायनिक खतांचा परिणाम पिकावर होत असून शेत जमिनीवर पण झाला असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत नापिकतेकडे झुकला आहे. जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढत चालले आहे. कमी वेळेत रासायनिक खतांच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी पिके घेतली,पण त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसते.





रासायनिक औषधांच्या फवारण्या व खतांचा वापर केलेली फळे, अन्न मानवाने खाल्ल्याने त्याचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत आहे,असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा काहीशा प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळू लागला असल्याचे दिसते. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे द्राक्ष बागांच्या पिकाचे माहेर घर समजले जाते. येथे द्राक्ष पिकाची वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. पण याच द्राक्ष पिकाच्या पट्यात येथिल शेतकरी राकेश देशमुख यांनी दोन एकर शेती क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवला आहे. रासायनिक गव्हापेक्षा सेंद्रिय पद्धतीच्या गव्हाचे पीक चांगल्या प्रकारे आले आहे. यासाठी केवळ 12 हजार रुपये खर्च आला आहे. हीच शेती रासायनिक पद्धतीने केली असती तर यासाठी साधारण 20 ते 25 हजार रुपये खर्च आला असता,असे शेतकरी राकेश देशमुख यांनी सांगितले. सेंद्रिय पद्धतीने गव्हाची लागवड केल्याने पीक अगदी जोमात आले आहे. त्यांची ही सेन्द्रीय पद्धतीची शेती पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी भेट देऊ लागले आहेत.

रासायनिक पद्धतीच्या शेतीतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही

गेल्या 15 वर्षापासून शेतकरी राकेश देशमुख रासायनिक पद्धतीने शेती करत होते. पण त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते. रासायनिक खतांच्या व औषधांच्या वाढत्या किंमतीने हैराण झाले होते. त्यामुळे राकेश देशमुख पर्यायी शेती मार्गाच्या शोधार्थ होते. अकलूज ता. माळशिरस येथील राकेश देशमुख यांचे काका यांनी त्यांना सेंद्रिय शेती करण्यास मार्गदर्शन केले. या सेंद्रीय शेतीचे फायदे व उत्पादन खर्च व्यवस्थित समजावून सांगितला. यशस्वी सेंद्रिय शेतीची काही उदाहरणे राकेश देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यानंतर देशमुख यांनी सेंद्रिय शेती करण्याचे ठरवून दोन एकरात सेंद्रिय पद्धतीने गव्हाची लागवड केली. त्यातून त्यांना अपेक्षित असलेले उत्पादन ही मिळेल,असे त्यांना वाटते.

रासायनिक गव्हाच्या तुलनेने सेंद्रिय गव्हाची उंची जास्त

रासायनिक गव्हाची उंची साधारणपणे दोन ते अडीज फुटाच्या आसपास असते. पण सेंद्रिय पद्धतीच्या गव्हाची उंची तीन ते साडेतीन फुटाच्या आसपास आहे. दोन एकर गव्हाचे क्षेत्र एकसमान उंचीचे आहे. या गव्हाची लागवड करत असताना शेतीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करून घेतली. त्यानंतर गव्हाची पेरणी न करता शेतात विस्कटून टाकण्यात आला. गव्हाची वाढ होत असताना तो दाट उगवून आला. असे असताना ही दोन एकरात गव्हाची उंची कोठेही कमी झाल्याचे दिसत नाही. तो सर्व एकसमान आला असल्याचे दिसते. या गव्हाला फक्त पाच वेळा पाणी देण्यात आले. म्हणजे कमी पाण्यात गहू आलेला आहे. गव्हाला रासायनिक गव्हाच्या लोंब्यापेक्षा जास्त लोंब्या आल्या आहेत. त्यामुळे सेंद्रिय गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकरी राकेश देशमुख यांनी व्यक्त केली. हा गहू green planet कंपनी घेऊन जाणार आहे. या गव्हाला बाजार मूल्याच्या दीड पट भाव देण्यात येणार आहे. या कंपनीने गहू लावण्यास मार्गदर्शन करून गव्हाचे उत्पादन जर चांगल्या प्रकारे नाही,आले तर गहू लागवडीस व शेतीच्या मशागतीसाठी आलेला खर्च देण्याची हमी कंपनीने दिली होती. सुदैवाने गव्हाचे पीक अगदी जोमात आले आहे. या गव्हाला चांगल्या प्रकारे रंगही प्राप्त झाला आहे.





रासायनिक खतांच्या सहाय्याने पिकवलेल्या फळं,अन्नधान्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण

रासायनिक खते आणि औषधांच्या सहाय्याने पिकवलेली फळ,अन्नधान्य खाल्यामुळे त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत असून त्यामुळे डायबेटीस, बीपी यासारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. असे राकेश देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे सध्या सेंद्रिय पद्धतीच्या शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे,भाज्या,अन्नधान्य पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्याचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या पिकांना विशेष महत्व आले आहे.

रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती फायद्याची

यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी राकेश देशमुख यांनी सांगितले, की गेल्या 15 वर्षांपासून रासायनिक पध्दतीने शेती करत आहे. पण त्यातून अपेक्षित असे उत्पादन निघत नव्हते. काकांच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेती चालू केली. यासाठी ग्रीन पँलँनेट कंपनीची उत्पादने वापरण्यात आली. रासायनिक पद्धतीने गव्हाची लागवड करण्यात आली असती,तर जास्त खर्च आला असता. सेंद्रिय पद्धतीच्या गव्हाच्या लागवडीसाठी कमी खर्च आला आहे. रासायनिक पध्दतीने केलेल्या गव्हाचे उत्पादन 30 ते 35 क्विंटल निघत होते. आता सेंद्रिय गव्हाचे उत्पादन 50 क्विंटलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळापासून लोकांना विषमुक्त शेतीचे महत्त्व समजले आहे. रासायनिक गव्हाला 4 ते 5 फुटव्या येत होत्या. आता सेंद्रिय गव्हाला 20 ते 25 फुटव्या आल्या आहेत. सेंद्रिय गहू टणक व दाणेदार आहे. या गव्हासाठी एक स्प्रे घेण्यात आला आहे. दोन भूमी पाँवरच्या बँगा वापरण्यात आल्या आहेत. हा गहू green planet कंपनी घेऊन जाणार असून त्यासाठी 4 हजार 500 रुपये ते 5 हजार रुपये भाव देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले असल्याचे राकेश देशमुख यांनी सांगितले. रासायनिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीतील अन्नधान्य,फळे,भाज्या यांचा परिणाम मानवी शरीरावर होत आहे. त्यातून बीपी,शुगर यासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली शेती पूर्णपणे नैसर्गिक असल्याने मानवी आरोग्याला पोषक अशी आहे. सेंद्रिय पद्धतीच्या फळे,भाज्या,अन्नधान्य याचा परिणाम मानवी शरीरावर जाणवत नाही. त्यामुळे लोकांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्याचा वापर करावा. असे शेतकरी राकेश देशमुख यांना वाटते.






सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष बागेची लागवड

शेतकरी राकेश देशमुख यांनी गव्हाच्या पिकाबरोबरच दोन एकरात सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष बागेची लागवड केली आहे. या बागेसाठी जनावरांचे गोमूत्र वापरण्यात आले आहे. याच्यावर रासायनिक फवारण्या करण्यात आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. बागेसाठी शेणखताचा वापर करण्यात आला आहे. बाग सेंद्रिय पद्धतीची असल्याने कमी खर्च झाला आहे. हीच बाग रासायनिक पद्धतीने केली असती तर जास्त प्रमाणात खर्च असला असता,असे शेतकरी राकेश देशमुख यांनी सांगितले. सेंद्रिय पद्धतीच्या शेतीमुळे पैशांची बचत झाली आहे. दिवसेंदिवस खतांच्या किंमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे. खर्चाची बचत करायची असेल तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे,असे शेतकरी राकेश देशमुख यांनी सांगितले.

Updated : 30 April 2022 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top