Home > मॅक्स रिपोर्ट > Lockdown : घरात अन्न नसल्यानं ३ वर्षाच्या बाळाने खाल्ले उंदराचे औषध!

Lockdown : घरात अन्न नसल्यानं ३ वर्षाच्या बाळाने खाल्ले उंदराचे औषध!

Lockdown : घरात अन्न नसल्यानं ३ वर्षाच्या बाळाने खाल्ले उंदराचे औषध!
X

सध्या कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. याचा सर्वात मोठा दुष्परीणाम कामगार, भटके विमुक्त अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांवर होत आहे. दररोज कमावलं तरच रात्री चूल पेटते. अशी या वर्गाची अवस्था असते. त्यातच लॉकडाऊन मुळे या सर्व वर्गाचे काम बंद झाले आहे.

त्याामुळं सकाळी अन्न मिळालं तर संध्याकाळी काय खायचे असा प्रश्न या लोकांसमोर आहे. हीच अवस्था पुणे जिल्ह्यातील महागाव निकम वाडी येथे पार्वती गणेश वाघमारे यांच्या कुटुंबाची झालीय.

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना त्या सांगतात, अन्न नसल्याने दोघं नवरा बायको उपाशी झोपलो होतो. माझा तीन वर्षाचा रितेश भुकेनं व्याकुळ होऊन घरातून बाहेर गेला. शेजारी असलेल्या उकिरड्यावर त्याला उंदीर मारायचं औषधं सापडलं. त्यानं ते काही खाल्ल्यावर त्यांच्या आई वडिलांना दाखवलं. बघं आई मी काय खाल्ल!

आईवडिलांनी हे पाहताच आरडाओरडा केला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय काळे कॉलनी येथे दाखल करण्यात आले. याबाबत ग्रामीण रुग्णालय काळे कॉलनी येथील वैद्यकीय अधिकारी सोनवणे याची सामाजिक कार्यकर्ते माहुली सोनवणे यांनी भेट घेतली असता, उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असून त्याला आता निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असल्याचं सांगितलं. त्याचे वडील गणेश वाघमारे सांगतात…

'कामधंदा बंद आहे .घरातले अन्नधान्य संपलेले आहे. या परिस्थितीत मुलाबाळांना जगावयाचे कसं? हा प्रश्न आमच्यापुढे आहे. खाऊ समजून मुलाने उकिरंड्यावरील औषध खायची वेळ आली आता, तरी या सरकारने आम्हा गरीबांना जगवण्याची जबाबदारी घ्यावी.’

या भागात राहणाऱ्या भटक्या कुटुंबांची अवस्था अत्यंत नाजूक बनली आहे. यातले बरेच जण रेशन कार्ड धारक नाहीत.सरकारच्या योजनेमध्ये केवळ कागदपत्रं नसल्याने ते बसू शकत नाहीत याबाबत बोलताना भटक्या विमुक्त समाजाचे नेते माहुली सोनवणे सांगतात.

या समाजाला आता जर सरकारने मदत केली नाही. तर ही कुटूंबं कोरोनाने नाही तर अन्नावाचून तडफडून मरतील. सरकारने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालून या लोकांच्या अन्नधान्याची सोय केली पाहिजे.

एका बाजूला सरकार कोरोनाशी कसोशीने लढत आहे. याचवेळी या भटक्या, कामगार वर्गातील लोक भुकेशी लढत आहेत. यांच्या भुकेचा प्रश्न सोडवला गेला नाही तर तर कोरोना ने मरणाऱ्यांपेक्षा भुकेने मरणाऱ्यांचा आकडा वाढेल.

Updated : 8 April 2020 1:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top