Home > मॅक्स रिपोर्ट > सफाई कामगाराच्या 'कस्तुरी' चित्रपटाचा सुगंध राजधानीत दिल्लीत दरवळला, चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक

सफाई कामगाराच्या 'कस्तुरी' चित्रपटाचा सुगंध राजधानीत दिल्लीत दरवळला, चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक

सफाई कामगारांच्या कपड्याचा येणारा वास आणि या वासाला शिक्षणाच्या कस्तुरीने दिलेला तडका, वाचा MPSC चा पेपर देताना एमपीएससीच्या पेपरमागे लिहिलेल्या कस्तुरी चित्रपटाच्या पटकथेला कसा मिळाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान? काय आहे महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेल्या कस्तुरी चित्रपटाची प्रेरणादायी कथा

सफाई कामगाराच्या कस्तुरी चित्रपटाचा सुगंध राजधानीत दिल्लीत दरवळला, चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक
X

सोलापूर : एप्रिल महिन्यात निवड झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार वितरण दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडले आहे. या सोहळ्याला विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. ६७ व्या चित्रपट महोत्सवात बार्शी येथील युवा दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कस्तुरी" या हिंदी चित्रपटाची सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून निवड करण्यात आली होती.

त्याचे पुरस्कार वितरण दिल्लीत झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी राजधानीत हा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वीकारला. बार्शीच्या या युवा दिग्दर्शकावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे.





सामाजिक वेदनेतून कस्तुरी चित्रपटाची निर्मिती पहिल्याच प्रयत्नात कस्तुरी चित्रपटाने सुवर्ण कमळावर आपली मोहर उमटवली. दिग्दर्शक विनोद कांबळे म्हणतात की, 'माझे आई-वडील,सफाई कामगार आहेत. त्यामुळे लहानपणी जीवन जगत असताना आलेल्या अडचणी म्हणजे स्वतःच्या सामाजिक वेदनेतून तयार झालेला कस्तुरी चित्रपट होय'. इंजिनिअरींग करता-करता चित्रपट क्षेत्राकडे वळला विनोद

बार्शीतील एका सफाई कामगाराचा मुलगा ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कस्तुरी चित्रपटाच्या दिग्दर्शकापर्यंतचा जीवनप्रवास उलघडताना विनोद कांबळे म्हणतात की, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बार्शीत झाले. पुढे सर्व मित्र इंजिनियरिंगला गेले. त्यामुळे इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. सातारा जिल्ह्यातील कराड येथून सिव्हिल इंजिरयरिंग पूर्ण केले. त्यानंतर एक वर्ष एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमागे विनोदने लिहली चित्रपटाची पटकथा…

विनोद एमपीएससी या स्पर्धा तयारी करीत असताना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. एमपीएससीच्या परीक्षेसाठी विनोदाचा पुण्यातील आकुर्डीला नंबर आला होता. परीक्षेच्या शेवटच्या १० ते १५ पंधरा मिनिटात प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे चित्रपटाची पटकथा लिहली होती. तेथेच ठरवले की, स्पर्धा परीक्षा सोडून सिनेमाच्या क्षेत्रात जायचे. तेथून कथा-पटकथा लिहण्यास सुरवात केली. भरपूर सिनेमे बघितले. अवांतर वाचन केले.

बार्शीत चित्रपट गृहात सिनेमा पाहत असताना आपले ही नाव पडद्यावर यावे असे वाटत असे. त्यानुसार वाटचाल करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या घटना पहात होतो. सफाई कामगाराचा मुलगा म्हणून अनेक अडचणी सोसल्या व त्यातून कस्तुरची कथा सुचली. असे विनोद कस्तुरी चित्रपटाची कथा कशी सुचली यावर भाष्य करताना सांगतो.

कशी आहे कस्तुरी चित्रपटाची कथा

कस्तुरी चित्रपटाची कथा म्हणजे एक मुलगा आठवीत शिक्षण घेत असतो. त्याला शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. पण परिस्थिती सतत आडवी येते. तो गटारी साफ करण्याचे काम करत असतो. वडिलांबरोबर काम करू लागतो. या कामामुळे त्यांच्या शरीराची येणारी दुर्गंधी त्याला सहन होत नाही. त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्याला माहिती मिळते की, कस्तुरी नावाचा पदार्थ आहे. त्याचे अत्तर बनवले तर त्याचा सूगंध महिना-महिना जात नाही. त्यामुळे चार चौघात बसता येते. अशी त्या मुलाची समजूत होते. त्यावरून तो मुलगा कस्तुरी शोधू लागतो. कस्तुरी मिळवताना त्याच्यात झालेला बदल म्हणजे "कस्तुरी" चित्रपट होय.

'चित्रपटातून स्वयं-प्रकाशित व्हा' असा दिला संदेश

या चित्रपटातून भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयं-प्रकाशित व्हा. असा संदेश दिला आहे. सफाई कामगाराचा मुलगा म्हणून लहानपणी जे अनुभवले होते. ते चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील ८ कर्तबगार महिलांनी एकत्र येत. कस्तुरी या चित्रपटाची निमिर्ती केली आहे. कस्तुरी चित्रपटाचे सर्व चित्रीकरण बार्शीत चित्रित झाले आहे.





'या' चित्रपटात काम केलेले कलाकार

या चित्रपटात समर्थ सोनवणे, अनिल कांबळे,वै शाली केंदले, मलसिद्ध देशमुख, अजय चव्हाण, कुणाल पवार, जयभीम शिंदे, विजय शिखरे, वाहिदपाशा शेख, लालाभाई शेख या बार्शीतील कलाकारांनी काम केले आहे.

शिक्षण हे एकमेव मानवाच्या आयुष्यातील कस्तुरी

कस्तुरी चित्रपटात सफाई कामगारांच्या आयुष्यात येत असणाऱ्या अडचणी व त्यांचे समाजातील स्थान महत्वाचे असून देखील कायमच दुर्लक्षित आहेत. हे अत्यंत उघडपणे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःच आयुष्य सुगंधित करण्यासाठी शिक्षण हे एकमेव आपल्या आयुष्यातील कस्तुरी आहे. ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सुगंध सर्वदूर पसरू शकतो आसा उत्तम संदेश या चित्रपटातुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे शेवटी दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी सांगितले.

पोस्टमार्टम करणाऱ्या युवकाच्या प्रेरणेने सुचली कस्तुरची कल्पना

कस्तुरी चित्रपटाचे उगमस्थान पोस्टमार्टम शॉर्ट फिल्म असल्याचे दिग्दर्शक विनोद कांबळे सांगतात. विनोदाला पेपर वाचनाची आवड होती. त्यावेळेस पेपरमध्ये पोस्टमार्टम करणाऱ्या युवकाची कहाणी छापून आली होती. त्यावेळेसच समाजव्यवस्थेचे पोस्टमार्टम करण्याची कल्पना सुचली. मग त्यावेळेस बार्शी च्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम काम करणाऱ्या सनी चव्हाची विनोदने भेट घेतली. त्याच्यासोबत फिरून त्याचे दुःख समजून घेतले. पोस्टमार्टम करत असल्याने त्याला कोणीच जवळ करत नव्हते. त्याला पाहून सर्वजण दूर जात असत. अत्तर लावणाऱ्या सनी पासून कस्तुरची कथा सुचिली असे विनोद सांगतो.

कस्तुरी चित्रपटात अभिनेत्री वैशाली केंदळे यांनी साकारली उत्तम भूमिका...

यापूर्वी विनोद कांबळे यांनी बनविलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. पोस्टमार्टममध्ये प्रमुख भूमिका स्वप्नील ढवळे, वैशाली केंदळे, अनिल कांबळे यांनी केलेल्या आहेत. तर कस्तुरी मध्ये प्रमुख कलाकार म्हणून समर्थ सोनवणे, वैशाली केंदळे, श्रावण उपळकर, अनिल कांबळे, मलसिद्ध देशमुख, अजय चव्हाण यांनी काम केले आहे. वैशाली केंदळे यांनी कस्तुरी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली असून त्या प्रमुख भूमिकेत आहेत.

वैशाली केंदळे यांना २०१९ साली "मसुटा" या चित्रपटासाठी मिळाला होता. सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्रीचा पुरस्कार

वैशाली केंदळे यांनी यापूर्वी अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामधून आपली अष्टपैलू ओळख निर्माण केलेली आहे. त्यापैकी काही चित्रपट म्हणजे पिस्तुल्या, ख्वाडा, फँड्री, मसुटा, पोस्टमार्टम, भेट, आक्रांत, सहल, निरस, ईत्यादी. चित्रपटाबरोबरच त्यांनी जाहिराती, म्युझिक व्हिडीओ (गाणी ) मध्ये देखील दखलपात्र अभिनय केलेला आहे.

"मसुटा" साठी त्यांना "दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार २०१९" मधे "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार " मिळालेला होता. अभिनयबरोबरच दिग्दर्शनातही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे.




वैशाली केंदळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना की, मी प्रमुख भूमिका केलेल्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही अतिशय गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होतोय. एका संवेदनशील विषयाच्या चित्रपटातील सादरीकरणामध्ये प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. याचे समाधान आहे. या यशाचे सर्व श्रेय संपूर्ण kastoori टीम ला आणि प्रेक्षक वर्ग ज्यांनी विषयाला गांभीर्याने बघून पसंती दिली... त्या सर्वांना श्रेय मी देते. अशी प्रतिक्रिया वैशाली केंदळे यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 26 Oct 2021 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top