Home > मॅक्स रिपोर्ट > ग्राउंड रिपोर्ट: मुस्लीमांना लसीची 'ॲलर्जी' का ?

ग्राउंड रिपोर्ट: मुस्लीमांना लसीची 'ॲलर्जी' का ?

देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ लागली आहे, मृतांची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी लसीकरण एकमेव शस्त्र उपलब्ध आहे. मात्र असे असतानाही लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या गैरसमजमुळे मुस्लिम समाजात लसीकरणाचा टक्का कमी आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे ज्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाही? लसीकरणाबाबत मुस्लिम भागात काय आहे चर्चा?,पाहू या आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राउंड रिपोर्ट...

ग्राउंड रिपोर्ट: मुस्लीमांना लसीची ॲलर्जी का ?
X

राज्यात विकेंड लॉकडाऊन असतानाही मुस्लिम भागात अजूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील काही शहरं ही मुस्लिम बहुल आहेत. अशाच शहरांपैकी औरंगाबाद हे एक शहर आहे. औरंगाबाद शहरातील शहागंज,चंपा चौक आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये अजूनही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अनेक जण सोशल डिस्टन्स सोडा पण साधा मास्क सुद्धा वापरायला तयार नाहीत. लोक असे का वनागत आहेत याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम समाजात 'कोरोना सच मै है क्या' ह्या वाक्याने गैरसमज निर्माण केल्याचे दिसून येते. यामुळेच मुस्लिम समाजातील नागरिक कोरोना टेस्ट आणि लसीकरणसाठी पुढे येत नाही.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात औरंगाबाद शहराचा आकडा चिंताजनक आहे. कधीकाळी दोन-तीनशे संख्येने सापडणाऱ्या रूग्णांची संख्या आता दोन हजाराच्या घरात गेली आहे. रोज 20 पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे जीव जातोय. पण अजूनही नागरिक कोरोनाबाबत गंभीर दिसत नाही. एवढेच नाही तर कोरोनाने आता धार्मिक रंग सुद्धा घेतला आहे.

रोज सापडणाऱ्या रूग्णांची संख्या पहिली तर यात मुस्लिम समाजातील लोकं कमी आहेत. आणि हीच परिस्थिती लसीकरणच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळत आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी मुस्लिम समाजातील अनेक लोक नकार देत आहे. मुस्लिम भागात लावलेल्या कॅम्पला अल्प प्रतिसाद मिळतोय.

जेव्हा याचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न केला असता कोरोना खरचं आहे का? असा प्रश्न मुस्लिम समाजातील अनेक लोकं थेट विचारत आहे. याचा दोष त्यांना देता येणार नाही, कारण काही मोजके लोकं सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून सामन्य लोकांपर्यंत चुकीचे मॅसेज, अफवा, खोट्या बातम्या पसरवत आहे.

लसीकरणाचा टक्का कमी!

कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने सरकारने यावर भर देत आहे. ठिक-ठिकाणी शिबीर घेऊन लसीकरण करण्याचे आवाहन केलं जातं आहे. मात्र असे असतानाही मुस्लिम समाजाचा कोरोना लसीकरणबाबत टक्का कमी आहे. विशेष म्हणजे हे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कबूल केलं आहे.

हे आहेत गैरसमज!

जेव्हा आम्ही मुस्लिम भागात रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला असता, मुस्लिम समाजात लसीकरण बाबत अनेक गैरसमज असल्याचं समोर आलं. लसीकरण केल्यावर पुन्हा कोरोना होतो, लसीकरण केल्यावर किडनी खराब होते, भविष्यात अनेक रोग लागण्याची शक्यता असे अनेक गैरसमज मुस्लिम समाजातील नागरिकांमध्ये निर्माण केली गेली आहे.

सोशल मीडियातून अफवा!

मुस्लिम भागातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजुतीचे कारण शोधले असता, सोशल मीडिया हे अफवा पसरवण्याच मुख्य केंद्र असल्याचं समोर आले आहे. सोशल मीडियावरून अनेक खोटे,चुकीचे, गैरसमज निर्माण करणारे मॅसेज फॉरवर्ड केले जात आहे. ज्यावर सर्वसामान्य मुस्लिम सहज विश्वास ठेवत आहे.

अशाप्रकारे फिरतात मॅसेज!

याचं एक उदाहरण पाहिले तर काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शासकीय रुग्णालयाच्या डीन ...यांना लस घेतल्यानंतर कोरोना झाला होता. आता ही बातमी अनेक दैनिकांत छापून आली होती. पण ही बातमी सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी वेगळ्या पद्धतीने मांडली. छापून आलेल्या बातमीसोबत,जर शासकीय रुग्णालयाच्या डीन यांना लस घेतल्यावर सुद्धा कोरोना होत असेल तर कोरोनाची लस बोगस आहे.लसीची कोणतीही खात्री नाही, त्यामुळे ही लस घेऊ नका, असा मॅसेज सोशल मीडियावर फिरवण्यात आला.

नागरिक काय म्हणतात?

आम्ही औरंगाबाद शहरातील काही मुस्लिम भागात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला रस्त्यावर पान विक्रेता मोहम्मद मुक्तार भेटले.लसीकरणबाबत विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर भयानक होतं. लस घेतल्याने लोकं मरतायत, अनेकांच्या किडन्या खराब होत आहे. त्यामुळे लसबाबत संभ्रम असल्याचं ते म्हणाले.

त्यानंतर आम्ही रफिक चाऊस यांच्याशी बोललो असता, त्यांनीही लसीकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. लसीबाबत अनेक संभ्रम आहे. लस घेतल्यावर सुद्धा कोरोना होतच आहे. मग लस कशासाठी घ्यायची असं रफिक चाऊस म्हणाले.

धर्मगुरूंचं आवाहन!

मुस्लिम समाजातील लसीकरणबाबत अनेक गैरसमज आहे,त्यामुळे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मुस्लिम धर्मगुरू मौलाना नसीम मिस्ताही म्हणाले. तसेच लसीकरण करण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यायला पाहिजे. कारण कुरान आणि हद्दीसमध्ये स्पष्ट उल्लेख केला गेला आहे की, जेव्हा मानव जातीवर एखाद्या रोगाचे आक्रमक होते तेव्हा त्यावर उपचार सुद्धा अल्लाहने दिलेलं असते,आणि आज कोरोनावर लस हेच उपचार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांनी लस घेतली पाहिजे असंही नसीम मिस्ताही म्हणाले.

आरोग्यमंत्र्यांचं आवाहन!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुस्लिम समाजातील आमदार,नेते, लोकप्रतिनिधी, धर्मगुरू यांच्या भेटी घेऊन लसीकरणबाबत समाजातील गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अजूनही काही लोकांशी चर्चा सुरू असून,लसीकरण दर वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं टोपे म्हणाले.

कोरोनाच्या संकटात लोकप्रतिनिधींची भूमिका मह्त्त्वाची आहे. पण एरवी मुस्लिम मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मुस्लिम समाजातील या गैरसमजाला दूर करण्याचे प्रयत्न केलेले दिसत नाहीत, हे स्पष्ट आहे. लोकप्रतिनिधींनी मुस्लिम समाजाला साद घालून, रस्त्यावर उतरून समजावण्याची गरज आहे. दुसरीकडे मुस्लिम बांधवांमध्ये अनेकांचे हातावर पोट असते. अशावेळी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर उपचारांचा खर्च परवडेल का, असाही प्रश्न त्यांना पडत असणार. चाचणी केल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत उपचार मिळू शकतात असा विश्वास या लोकांना देण्याची गरज आहे. पण लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन असल्याचेच चित्र आहे. मुस्लिम वस्त्यांमधील अस्वच्छतेवरही मॅक्स महाराष्ट्रने याआधी ग्राऊंड रिपोर्ट केले आहेत. आरोग्याच्या बाबतीत या वस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कायम दिसते. त्यामुळे आता तरी सरकारनेही मुस्लिम समाजात जनजागृती करण्याची गरज आहे. सरकारने मुस्लिम समाजातील नेते, धर्मगुरू यांच्या मदतीने लसीकरण आणि कोरोना चाचण्यांबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

ग्राउंड रिपोर्ट: मुस्लीमांना लसीची 'ॲलर्जी' का ?

ग्राउंड रिपोर्ट: मुस्लीमांना लसीची 'ॲलर्जी' का ?

देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ लागली आहे, मृतांची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी लसीकरण एकमेव शस्त्र उपलब्ध आहे. मात्र असे असतानाही लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या गैरसमजमुळे मुस्लिम समाजात लसीकरणाचा टक्का कमी आहे. नेमकं काय कारण आहे ज्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाही? लसीकरणाबाबत मुस्लिम भागात काय आहे चर्चा?,पाहू या आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राउंड रिपोर्ट...

Posted by Max Maharashtra on Saturday, April 10, 2021

Updated : 9 May 2021 5:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top