Home > मॅक्स रिपोर्ट > शेतकऱ्याने मेहनत करत जगवली डाळींबाची बाग

शेतकऱ्याने मेहनत करत जगवली डाळींबाची बाग

रोगराई आणि वातावरण बदलामुळं डाळींब बागा जळू लागल्या होत्या पण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील शेतकरी दादाराव माळी यांनी डाळींब बाग लावण्याचे धाडस करून बाग उत्तम जोपासली आहे. त्यांच्या बागेतील डाळींबाच्या झाडांना चांगली फळधारणा झाली आहे. त्यांच्या या डाळींबाला मार्केटमध्ये मागणी असून 140 रुपये किलोने विकले जाणार जाईल, असा विश्वास शेतकरी दादाराव माळी यांना आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...

शेतकऱ्याने मेहनत करत जगवली डाळींबाची बाग
X

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला डाळींबाचे माहेर घर समजले जाते. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात डाळींब पिकामुळे सुख समृद्धी आली. तालुक्यात सर्व काही सुरळीत चाळले होते. पण गेल्या वर्षी अचानक जास्त पाऊस झाल्याने डाळींबाच्या बागांना मर रोगाने पछाडले. त्यावर फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी निराश झाले. त्यातच या डाळींब बागावर पिन हॉल बोरर, तेल्या,कुजकट या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्याचाही परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागला. रोगांच्या प्रादुर्भावामुळे या भागातील पूर्ण डाळींब बागा उध्वस्त झाल्या असल्याच्या दिसतात. या बागांनी ना फळ धारणा केली,ना त्यांची व्यवस्थित वाढ झाली. त्यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. तो निराशेच्या छायेत गेला आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे डाळींब बागांच्या संशोधनासाठी टीम पाठवण्याची विनंती केली. टीम आली डाळींबाच्या बागांची पहाणी केली. मात्र फरफेक्ट असा उपाय मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांनी शासनाकडे जळालेल्या बागांसाठी अनुदानाची मागणी केली. पण अनुदान काही मिळाले नाही. बागा जळत असल्याने यावर उपाय मात्र सापडला नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी दुसऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. येणाऱ्या काळात डाळींबाची शेती कमी होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा भीतीदायक वातावरणात मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील शेतकरी दादाराव माळी यांनी डाळींब बाग लावण्याचे धाडस करून बाग उत्तम जोपासली आहे. त्यांच्या बागेतील डाळींबाच्या झाडांना चांगली फळधारणा झाली आहे. त्यांच्या या डाळींबाला मार्केटमध्ये मागणी असून 140 रुपये किलोने विकले जाणार जाईल. असा विश्वास शेतकरी दादाराव माळी यांना आहे. एकीकडे डाळींब बागा जळू लागल्या असताना शेतकरी दादाराव माळी यांनी जोपासलेल्या बागेला विशेष महत्व आले आहे. त्यांच्या या बागेला शेतकरी भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले आहेत.





दीड वर्षाच्या बागेला आले भरघोस उत्पादन

शेतकरी दादाराव माळी यांची डाळींबाची बाग दीड वर्षाची असून तिला भरगोस असे उत्पादन आले आहे. या बागेला चांगली फळधारणा झाली आहे. बागेची चांगल्या प्रकारे वाढ झाली असून या डाळींब बागेच्या झाडांना एकाच ठिकाणी सात ते आठ डाळींब फळांचा झुबका पहायला मिळतो. त्यामुळे भविष्यात डाळींबाचे झाड जस-जसे मोठे होईल तस -तसे डाळींब झाडांवर ओझे वाढत जाणार आहे. या ओझ्याचा झाडांवर काहीही परिणाम होणार नाही. असे शेतकरी दादाराव माळी यांनी सांगितले. त्यांनी साधा भगवा या डाळींबाच्या वाणाची लागवड केली आहे. या बागेला ठिबक सिंचनने पाणी पुरवठा केला असून बागेत त्यांनी अतिरिक्त गवताची वाढ होऊ दिली नाही. तिची व्यवस्थित निघा राखली आहे. वेळच्या वेळी फवारण्या केल्या असून बागेतील झाडांना फुल धारनेबरोबरच चांगल्या प्रकारे फळ धारणा झाली आहे. त्यामुळे या बागेतील झाडांच्या डाळींबाची संख्या वाढतच चालली आहे. सध्या डाळींब भगवा रंग धारण करू लागले आहे. या बागेतील एक फळ 50 ते 60 ग्रॅम भरत आहे. डाळींबाच्या या फळांना मार्केटमध्ये मागणी असून या डाळींबाला 140,150,160 रुपये किलोने प्रमाणे भाव आहे.





डाळींब बागेवर रोगांचा प्रादुर्भाव नाही

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी दादाराव माळी यांनी सांगितले की, डाळींब बागेची लागवड केल्यानंतर या बागेवर कोणतेच रोग पडले नाहीत. ही बाग पहिल्या वर्षांची असून ती 18 महिन्याची आहे. डाळींबाच्या बागेची वाढ होत असताना बागेवर आयसिस्ट कंपनीच्या औषधांची फवारणी केली आहे. त्याचबरोबर कृषी अमृत,साँईल टेक्नॉलॉजीची टेक्निक पद्धत वापरली आहे. त्यामुळेच बागेमधील झाडांना चांगली फळधारणा झाली आहे. झाडाला पहिल्याच वर्षी फळ धारणा झाली असून सरासरी 10 किलोच्या आसपास माल निघेल. डाळींबाच्या झाडांना कृषी अमृत टाकले असल्याने झाडांची कॅनॉपी चांगली वाढली असून त्याचबरोबर स्टोरेज ही वाढले आहे. झाडे जळण्याचे प्रमाण कमी असून यावर मर रोग व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. एकीकडे डाळींब बागा जळत असताना मनात डाळींब बाग लावण्याची भीती पण होती. डाळींब बाग लावत असताना साँईल टेक्नॉलॉजीचे व्हिडीओ युट्युबवर बघितले. त्यांचा रिझल्ट बघितला. त्यानंतर डाळींब बाग लावण्याचे धाडस केले. ही डाळींब बाग लावत असताना रोपांची 14 बाय 18 वर लागण केली असून बागेला ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन केले आहे. शेतीला पाणी देण्यासाठी कॅनॉलवरून पाइपलाइन केली असून हा कॅनॉल उजनी धरणातून आलेला आहे. शेतीच्या पाण्यासाठी दोन विहरी असून एक बोर आहे. डाळींबाचा पाच एकराचा प्लॉट असून त्यासाठी 1850 रोपे लागली आहेत. झाडांची चांगली निघा राखल्याने प्लॉट सक्सेस झालेला दिसतोय. या 17 ते 18 महिन्याच्या कालावधीत बागेवर कोणत्याच प्रकारचे रोग पडले नाहीत. बागेवर तेल्या रोग,मर रोग किंवा खोड कीड दिसत नाही. या बागेला वर्षभरात एकदाही फवारले नाही.

साँईल टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे झाडाची पांढरी मुळी ऍक्टिव्ह

साँईल टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे झाडाची पांढरी मुळी पूर्ण ऍक्टिव्ह झाली आहे. त्यामुळेच झाडांची कॅनॉपी टिकून राहिली आहे. या झाडांवर स्प्रे घेतले असून त्यासाठी सुपर चार्जर, वाँटर चार्जर,फ्रुट चार्जर,क्रॉप चार्जर घेतले आहेत. कॅनॉपीसाठी फवारण्या घेतल्या. झाडांची 10 दिवसाला पहाणी करत असून झाडांची पांढरी मुळी पूर्ण ऍक्टिव्ह असेल तर झाडांना स्ट्रेस येणाचा धोका कमी असतो. या बागेच्या लागवडीसाठी आणि फवारण्यासाठी आतापर्यंत साडेतीन ते चार लाख रुपये खर्च आला आहे. असे शेतकरी दादाराव माळी यांनी सांगितले.





शेतकऱ्यांनी साँईल टेक्नॉलॉजीचा वापर करावा

एकीकडे डाळींब बाग उध्वस्त झाल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यानी नवीन डाळींब बागांची लागवड करत असताना साँईल टेक्नॉलॉजीचा वापर करावा. मी ही औषधे वापरल्याने बाग चांगली आली आहे. फळधारणा व्यवस्थित झाली आहे. यावर कोणत्याच रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी साँईल टेक्नॉलॉजीचा वापर करावा,असे शेतकरी दादाराव माळी यांना वाटते.


Updated : 7 May 2022 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top