देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा जाहिरातीचा एका दिवसाचा खर्च ८५ हजार रुपये!
X
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ‘महाराष्ट्र शासनाच्या टीव्ही व रेडिओ वाहिन्यांवरुन जाहीरात प्रसिद्धी करता’ किती खर्च झाला याची माहिती नितीन यादव यांनी मागितली होती. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दिवसाला 85 हजार रुपये फक्त जाहीरातीसाठी खर्च करण्यात आले आहेत. एकूण पाच वर्षाचा विचार केला तर 15 कोटी 28 लाख 82 हजार 975 रुपये फडणवीस सरकारने फक्त टीव्ही आणि रेडिओ साठी खर्च केले होते.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर या गावातील नितीन यादव यांनी 20 सप्टेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात टीव्ही आणि जाहिरातीसाठी किती खर्च झाला? अशी माहिती माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये मागितली होती. शासनाने दिलेल्या उत्तरात फडणवीस सरकारने टीव्ही आणि रेडिओवर दिलेल्या जाहिराती ची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
माध्यम | 2013-2014 | 2015-2016 | 2016-2017 | 2017-2018 | 2018-2019 | 2019-20 |
रेडिओ वाहिन्या | 59,96,281 | 84,84,989 | 46,96,870 | 1,20,69,877 | 1,85,72,887 | 11,32,149 |
टी.व्ही वाहिन्या | 53,25,703 | 66,42,364 | 44,63,088 | 5,99,97,520 | 2,84,48,317 | 83,74,914 |
जर आपण 2013 -14 मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आणि 2015-16 ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आल्यानंतर दोन्ही सरकारच्या जाहिरातीच्या खर्चाचा तुलनात्मक विचार केला असता कॉंग्रेसच्या काळात 2013-14 मध्ये रेडिओसाठी 59 लाख 96,281 रुपये खर्च झाले. तर 2015-16 मध्ये 84 लाख 84,989 रुपये झाले. दोनही वर्षातील खर्चाचा विचार केला तर एका वर्षात जाहीरातीचा खर्च 24 लाख 88 हजार 708 रुपयांनी वाढल्याचं दिसून येतं. फडणवीस सरकारच्या काळातील 5 वर्षात रेडिओवरील जाहीरातींवरील एकूण खर्चाचा विचार केला तर तो खर्च 4 कोटी 49 लाख 56 हजार 772 रुपये इतका प्रचंड खर्च झाल्याचं दिसून येतं.
हे ही वाचा
… नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत, भाजप नेत्याचे संतापजनक विधान
Budget 2020 : महत्वाकांक्षी भारतात वंचितांचा ना सहभाग ना विकास
धक्कादायक : विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
तर दुसरीकडे आपण टिव्हीवरील खर्चाचा विचार केला तर 2013 -14 मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आणि 2015-16 ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आल्यानंतर या दोनही सरकाच्या जाहिरातीच्या खर्चाचा तुलनात्मक विचार केला असता, कॉंग्रेसच्या काळात 2013-14 मध्ये टीव्हीवरील जाहीरातीसाठी 53 लाख 25 हजार 703 रुपये खर्च झाले. तर 2015-16 मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर 66 लाख 42 हजार 364 रुपये इतके पैसे खर्च झाले आहेत. दोनही वर्षातील खर्चाचा विचार केला तर एका वर्षात जाहीरातीचा खर्च 13 लाख 16 हजार 661 रुपयांनी वाढल्याचं दिसून येतं. फडणवीस सरकारच्या काळातील 5 वर्षात टीव्हीवरील जाहीरातींवरीच्या एकूण खर्चाचा विचार केला तर तो खर्च 10 कोटी 79 लाख 26 हजार 203 रुपये इतका प्रचंड खर्च झाल्याचं दिसून येतं.
फडणवीस सरकारच्या काळात टीव्ही आणि रेडिया या माध्यमांवर दिलेल्या जाहीरातींसाठी एकूण खर्चाचा विचार केला तर हा खर्च 15 कोटी 28 लाख 82 हजार 975 रुपयांपर्यंत गेलेला दिसून येतो. इतका प्रचंड खर्च करुनही सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतात का? फडणवीस सरकारच्या काळात इतक्य़ा मोठ्या प्रमाणात जाहीराती देऊन देखील शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का? याचं उत्तर जर नकारार्थी असेल तर... इतक्या प्रचंड पैशाच्या जाहिराती नक्की कशासाठी? याचा विचार आपण कधी करणार आहोत का? आता सरकार बदलले आहे. आता या सरकारने मागच्या सरकारची री ओढता कामा नये.