Home > मॅक्स रिपोर्ट > गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचे काय? खारेपाट विभागातील महिलांचा संतप्त सवाल

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचे काय? खारेपाट विभागातील महिलांचा संतप्त सवाल

एका बाजूला महागाईच्या आगडोबानं सर्वसामान्यांचे जगनं मुश्किल झालं असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाटं विभागात भीषण पाणी टंचाईनं डोके वर काढले आहे. मात्र पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील अनेक गावे वाड्या वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे.घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरु असून दूषित गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचे काय? खारेपाट विभागातील महिलांचा संतप्त सवाल
X

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाटं विभागात भीषण पाणी टंचाई ने डोके वर काढले आहे. घोटभर पाण्यासाठी येथील महिलांची रखरखत्या उन्हात, रात्री व पहाटे वनवन भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी महिला प्रचंड हाल सोसत आहेत. वर्षानुवर्ष येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे, मात्र याकडे कुणी राजकारणी व प्रशासन गांभिर्याने पाहत नाहीत. जनता जगो अथवा मरो कुणाला काही देणेघेणे नाही अशी परिस्थिती आहे.





दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात या विभागाला पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागतात. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू ही राजकारण्यांची पोकळ व तकलादू आश्वासने हवेत विरून जातात, मात्र आजतागायत येथील पाणी प्रश्न जैसे थे आहे, सरकारे बदलतात, मात्र कुणीही आमचे दुःख वेदना जाणत नाही, आमची कुणाला कीव येत नाही, जे पाणी गुरे ढोरे ही पिणार नाहीत, इतके दूषित, गढूळ व दुर्गंधी युक्त पाणी , खारे पाणी आमच्या वाट्याला आलेय. हे पाणी पिऊन मरायचे काय अशी व्यथा मांडत येथील महिला व ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

महागाईने कम्बरडे मोडले आहे, तेल, सिलेंडर गैस, डाली चे भाव गगनाला भिडलेत, जगणे मुश्किल झाले आहे, त्यात पाणी कुठून विकत घेणार? पाहुणे आले तर हे पाणी पित नाहीत, बिसलेरी पाणी पितात, काय करावे कसे जगावे हा प्रश्न सतावतो आहे. उष्म्याने जीव जायची वेळ आलीय. रोज किमान 5 ते सात लीटर पाणी पीने गरजेचे आहे, मात्र रोज विकत घेणारे पाणी परवडत नसल्याने पाणी कमी प्रमाणात पित असल्याचे महिलांनी अत्यंत वेदनादायी वास्तव मांडले.





पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे. मार्च महिन्यापासून सर्वत्रच पिण्याच्या पाण्याची बोंबा बोंब सुरू होते. कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु पाणी साठवण व्यवस्था चांगली नसल्याने पावसाचे पाणी नाल्यावाटे समुद्राला मिळते. कोकण विभाग अतिवृष्टीचा असला तरी पाण्याची झळ सोसावी लागते. पेण तालुक्यात मोठी धरणे आहेत. परंतु या तालुक्यातील जनता पाण्यावाचून नेहमीच तडफडत असते. जलसंपदा, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यांचा समन्वय आणि नियोजन नसल्याने ही परिस्थिती आहे.शहापाडा धरण पाणी योजनेस हेटवणे धरणातून पाण्याचा साठा उपलब्ध करुन दिल्यास, या धरणातून वडखळ व वाशी विभाग, कधीच पिण्याच्या पाण्या पासून वंचित राहाणार नाही. परंतु या धरणाच्या दुरुस्तीसाठी किंवा पाणीपुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक निधी यंत्रणेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. सध्या वाशी खारेपाटातील जनतेचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत जागावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने छोटे पंप लावावे लागतात. तसेच अनेक ठिकाणी पाइप गळती असल्याने शेतातील खारे पाणी शिरून पिण्याचे पाणी दूषित देखील होते. अशामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले लोक गावी जाताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेवून जातात. मिळणारे पाणी कमी असल्यामुळे जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत. अशी गंभीर परिस्थिती या विभागातील जनतेची आहे.

आमची मुले उच्चशिक्षित आहेत, चांगल्या कामावर आहेत, मात्र पाण्याच्या समस्यांने कोणताही बाप आपली मुलगी या पाण्याच्या दुष्काली भागात द्यायला तयार होत नाही, त्यामुळे खुप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे येथील वृद्ध महिलांनी सांगितले. येथील काही गावात तलाव व विहिरी असून देखील या गावाना पाणी टंचाईचा शाप आहे, विहिरी आटल्या आहेत, तर तलावात प्रचंड घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी आहे, या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभाव देखील पहावयास मिळतोय.




पाणी मिळविण्यासाठी शाळकरी मुली यांची देखील धावपळ होते, परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. पाणी प्रश्नावर अनेकदा मोर्चे, ठिय्या आंदोलनं उपोषण केले, मात्र बिसलेरी चे पाणी पिणाऱ्या त्या अधिकार्‍यांना आमचे दुःख काय कळणार?असा सवाल महिलांनी उपस्थित केलाय.

आमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला नाही, तसेच आम्हाला मुबलक व शुद्ध पाणी मिळाले नाही तर निवडणुकीत राजकारण्यांना आमच्या दारात उभे करणार नाही असा इशारा देखील खारेपाट विभागातील संतप्त महिलांनी दिलाय, आमच्या भावनांचा अंत पाहू नका, जलद पाणी प्रश्न सोडवा अन्यथा यापुढे आम्ही सर्व महिला हंडे घेउन शासकीय कार्यालयाला घेराव घालून काम बंद करू असेही संतप्त झालेल्या महिलांनी इशारा दिला.





जोपर्यंत आपण मान्सूनच्या काळात जल संचय करत नाही, तोपर्यंत आपल्याला जल संकटाशी सामना करावाच लागेल. तथापि जर पावसाचे पाणी संरक्षित करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली तरच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल. इतकेच नाही तर पाण्यावरुन होणार्‍या राजकारणापासूनही कायमची सुटका मिळेल. ज्या विभागांत पाऊस फार कमी पडतो, तेथे तर पाताळातील पाणीच एकमेव स्रोत आहे, तेथे कसं पाणी टंचाईपासून बाहेर पडता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालय स्थापन करुन गांभीर्याने पाणीप्रश्नाकडे पहायला सुरुवात केली आहे, पण या परिघात त्यांनी तलाव आणि विहिरींचा पुनरुद्धाराची बाब हाताळायला हवी, तसेच पाण्याला राष्ट्रीय संपदा म्हणून घोषित करुन जल संकटावर तोडगा काढला पाहिजे. तरच भविष्यात देशातील नागरिकांचं जीवन सुरक्षित राहील. असे मत जल अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

Updated : 29 April 2022 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top