२७ हजार भारतीय दररोज नोकऱ्या गमावत आहेत – राहुल गांधी
Max Maharashtra | 5 April 2019 8:31 AM GMT
X
X
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारच्या ध्येधोरणांवर टीका करत मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतात दररोज २७ हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचं राहुल यांनी सांगितलं. पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
यावेळी राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली. आजीला (इंदिरा गांधी) यांना खुप घाबरत होतो, घाबरून पडद्यामागे लपायचो, अशी आठवणही राहुल यांनी यावेळी शेअर केली. आही सत्तेत आलो तर संसदेत आणि विधीमंडळामध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवू, असं आश्वासनंही यावेळी राहुल यांनी दिलं.
बालाकोट इथल्या हल्ल्याचं श्रेय हे हवाई दलाचं यश आहे, ते त्यांना मिळालंच पाहिजे, असं राहुल यांनी सांगितलं. मध्यमवर्गीयांच्या आर्थिक भावनांना हात घालत राहुल म्हणाले, मध्यमवर्गियांकडून आयकर घेण्यात येऊ नये, शिवाय आयकरामध्ये वाढही होऊ नये, त्यासाठी आमची न्याय योजना परिणामकारक ठरेल, असं ते म्हणाले.
अनुभवातून मला हिंमत आली आहे, जे सत्य आहे ते स्विकारलं आहे. सत्यातून नेहमीच हिंमत येते. खोटं स्विकारलं तर भीती निर्माण होते. सत्य कधीही कडवं असतं पण ते स्विकारावं लागतं, असं तात्विक उत्तर राहुल यांनी एका प्रश्नाला अनुसरून दिलं.
एका विद्यार्थीनीनं सुशिक्षित बेरोजगारांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नसल्याचा प्रश्न विचारला. त्यावर भारतात दररोज २७ हजार नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे चीनमध्ये दररोज ५० हजार नोकरीच्या संधी निर्माण होत असल्याचं सांगत दोन्ही देशांमधील बेरोजगारीचं चित्र स्पष्ट करण्याचा राहुल यांनी प्रयत्न केला.
माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे. मात्र, त्यांचाच माझ्यावर राग असल्याचं उत्तर राहुल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. राजकारणातही निवृत्तीचं वय असलंच पाहिजे, ६० वर्षे हे योग्य वय असल्याचं राहुल यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर राहुल यांना लग्नाबाबत विचारणा करणारा प्रश्न अभिनेता सुबोध भावेनं विचारला. त्यावर मिश्किलपणे उत्तर देत राहुल म्हणाले, माझं लग्न माझ्या कामाशी झालेलं आहे.
Updated : 5 April 2019 8:31 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire