Home > मॅक्स रिपोर्ट > डाळींबाचा कॅलिफोर्निया होतोय उध्वस्थ...

डाळींबाचा कॅलिफोर्निया होतोय उध्वस्थ...

कधीकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्याची ओळख कधी डाळींबाचा कॅलिफोर्निया झाली हे कळाले देखील नाही. विविध समस्या आणि रोगराईमुळे कधीकाळी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणाऱ्या डांळिंबाच्या बागा शेवटच्या घटका मोजत आहेत, ही चिंताजनक परिस्थिती प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट.....

डाळींबाचा कॅलिफोर्निया होतोय उध्वस्थ...
X

कधीकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्याची ओळख कधी डाळींबाचा कॅलिफोर्निया झाली हे कळाले देखील नाही.माळरानावरील डाळींबाला महाराष्ट्र आणि देशात स्थान मिळवूशेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आली. विविध समस्या आणि रोगराईमुळे कधीकाळी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणाऱ्या डांळिंबाच्या बागा शेवटच्या घटका मोजत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट.....

एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून गणल्या गेलेल्या सांगोला तालुक्याची ओळख कधी डाळींबाचा कॅलिफोर्निया झाली.डाळींब उत्पादनाला महाराष्ट्र आणि देशात स्थान मिळवून देण्याचे काम येथील शेतकऱ्यांनी केले. शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच येथील डाळींबाची ओळख जगभरात पोहचली. येथिल माळरानांवर सर्व प्रकारच्या डाळींबाची लागवड पहायला मिळते. डाळींब बागानी शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आणली. त्यामुळेच शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले. पण सध्या या तालुक्यातील डाळींब बागा शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडल्याने त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकऱ्यांनी तर डाळींबाच्या बागा आहे,त्या स्थितीत शेतात सोडून दिल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी डाळींबाच्या बागा मोडून दुसऱ्या पिकांची वाट धरली आहे. शासनाने योग्य पावले नाही उचलल्यास येत्या काही दिवसात या भागातील डाळींबाच्या बागा नामशेष होतील,अशी भीती येथील शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. सांगोला तालुक्याची डाळींबाचा कॅलिफोर्निया म्हणून असलेली ओळख येत्या काही दिवसात पुसली जाईल,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.


डाळींब बागा चालल्या जळून

सांगोला तालुक्यातील अनेक शेतकरी हतबल झाले असून अनेक औषधांच्या फवारण्या करून देखील डाळींब बागा जळून चाललेल्या आहेत. या जळून चाललेल्या बागांसाठी शासन काहीही संशोधन करीत नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. कृषी विभागाचे अधिकारी येतात आणि बागेची पाहणी करून जातात. पण या बागा वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंढरपूर-सांगोला रस्त्याच्या कडेने तर अत्यंत विदारक चित्र असून या रस्त्यावरून जात असताना अनेक बागा जळून जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. या रस्त्यावरून कृषी विभागाचे अधिकारी जात नसतील का ? त्यांच्या नजरेस या जळून चाललेल्या बागा पडत नसतील का ? जर पडत असतील यावर शेतकऱ्यांना योग्य उपाय का सुचवले जात नाहीत,असे अनेक प्रश्न या भागातील शेतकऱ्यातून विचारले जात आहेत. पंढरपूर-सांगोला रस्त्यावर बागांची जशी अवस्था झाली आहे,तशीच अवस्था सांगोला तालुक्यातील अनेक बागांची झाली आहे. या जळून चाललेल्या बागांकडे शासनाने लक्ष द्यावे,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

मर,पिन होल बोरर (खोड कीड) या रोगांमुळे डाळींब बागा होऊ लागल्या उध्वस्त

सांगोला तालुक्याला डाळींबाचे हब समजले जाते,पण डाळींब बागांवर मर,होल बोरर या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील शेतकरी अडचणीत आला असल्याचे दिसते. बागेच्या संवर्धनासाठी येथील शेतकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. विविध औषधांची फवारणी केली. परंतु बागा जळायाच्या थांबेना गेल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी इतर पिकांकडे वळला आहे. या पिकांवर ही त्यांचा भरवसा राहिलेला नसल्याचे दिसते. डाळींबाच्या बागांवर विविध औषधांची फवारणी करून देखील रोग आटोक्यात येत नसल्याने या भागातील शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे.




डाळींबाच्या व्यापारामुळे जगप्रसिद्ध झालेल्या अजनाळे गावातील डाळींब व्यापारावर झाला परिणाम

सांगोला तालुका एके काळी दुष्काळी तालुका म्हणून गणला जात होता. पण येथील शेतकरी वर्गाने काबाड कष्ट करीत येथील माळरानावर डाळींबाची शेती फुलवली. त्यासाठी त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले. सांगोला तालुक्याला डाळींबाचे कॅलिफोर्निया समजले जाते. पण या तालुक्यातील डाळींब बागांवर विविध प्रकारचे रोग पडले असून त्याचे निराकरण होत नसल्याने येथील डाळींब बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी शासनाने योग्य पावले उचलून डाळींब बागा वाचवण्यासाठी संशोधन करून रोगावर उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. या तालुक्यातील अजनाळे गाव डाळींबाच्या व्यापारामुळे जगप्रसिद्ध झाले,परंतु आता येथील बागांना रोगांची घरघर लागल्याने येथील शेतकरी अडचणीत आले असल्याचे पहायला मिळत आहे. अजनाळे गावच्या शेतकऱ्यांनी माळरानावर पाण्याचे चांगल्या प्रकारे नियोजन करीत डाळींबाचे नंदनवन फुलवले होते. यामुळे येथील लोकांच्या जीवनात अमुलाग्रह बदल देखील झाला होता. येथिल प्रत्येक शेतकऱ्यांकडे राहण्यासाठी चांगल्या प्रकारचा बंगला,गाडी आली हे सारे वैभव डाळींब बागांमुळे मिळाले,असे येथील शेतकरी सांगतात. पण मागील तीन वर्षांपासून या गावातील शेतकऱ्यांना विविध समस्याना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी येथील शेतकऱ्यांत जोर धरू लागली आहे. अजनाळे गावातील शेतकऱ्यांची प्रगती डाळींब बागांमुळे झाली. डाळींब व्यापाराची वर्षाला 200 ते 300 कोटी रुपयांची उलाढाल होत होती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून येथील डाळींबाच्या व्यापारात कमालीची घट झाली आहे. डाळींब व्यापार पूर्वपदावर येण्यासाठी शासनाने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष दयावे,अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून करण्यात येवू लागली आहे.

डाळींबाच्या बागा उध्वस्त होत असल्याने विविध प्रकारच्या समस्या झाल्या निर्माण

या तालुक्यातील शेतकरी काही वर्षांपूर्वी दुसऱ्या ठिकाणी शेतमजूर म्हणून कामाला जात होते. अजनाळे गावच्या परिसरात माळरान होते. तेथे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा अभाव होता. परंतु या गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करीत डाळींब बागा फुलवल्या. त्यामुळे रोजगारासाठी होणारी पायपीट थांबली. उलट या गावच्या शेतात आजूबाजूच्या गावातील शेतमजूर कामाला येत येवू लागले. परंतु आता बागा उध्वस्त होऊ लागल्याने शेतमजुरांवर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याचे दिसते.



डाळींब संशोधन केंद्रातून जळून चाललेल्या बागांवर संशोधन करण्याची मागणी

डाळींबाच्या बागांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सोलापूर शहराच्या जवळ डाळींब संशोधन केंद्र उभारले. परंतु सांगोला तालुक्यातील जळून चाललेल्या बागांवर या संशोधन केंद्रातून काहीच उपाय योजना केल्या जात असल्याची खंत येथील शेतकरी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी जळून चाललेल्या बागांवर अनेक फवारण्या केल्या. परंतु बागा कशाने उध्वस्त होत आहेत,तेच कळेना गेले आहे. त्यासाठी शासनाने डाळींबावर संशोधन करणे गरजेचे आहे.असे येथील शेतकऱ्यांना वाटत आहे.

शासनाने जळून चाललेल्या बागांच्या रक्षणासाठी कमिटी नेमावी

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी वसंत रेड्डी यांनी सांगितले,की आमचे कुटुंब कर्नाटक राज्यातील असून आमच्या पंजोबानी सांगोला तालुक्यातील सावे गावात जमीन घेतली होती. तेव्हांपासून या गावात आम्ही स्थायिक झालो. आता आमची तिसरी पिढी शेती करत आहे. पूर्वी डाळींब शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत होते. परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून डाळींब शेती अडचणीत आली आहे. कोरोनाच्या आधी जास्त पाऊस झाल्याने डाळींबाच्या बागत पाणी साचून राहिले होते. त्यामुळे डाळींब बागाना मर रोग लागला. त्याचबरोबर पिन होल बोरर,तेल्या कुजकट या रोगाने ही या बागांवर थैमान घातले. यावर अनेक फवारण्या करून देखील बागा जळायच्या थांबल्या नाहीत. यामुळे या भागातील डाळींबाच्या बागा कमी होत असून अनेक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळले आहेत. या जळून चाललेल्या बागांवर उपाय योजना करण्यासाठी शासनाने कमिटी नेमून संशोधन करावे व त्यावर उपाय सुचवावेत. असे शेतकरी वसंत रेड्डी यांनी बोलताना सांगितले.


डाळींब बागा उध्वस्त होण्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत

डाळींब बागा उध्वस्त होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये वातावरणात झालेले बद्दल याचा ही समावेश होतो. यासाठी फक्त पिन होल,बोरर आणि मर रोग कारणीभूत नाहीत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार तेथील शेतकऱ्यांत मेळावे घेवून जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. असे डाळींब संशोधन केंद्राचे संशोधक पोकळे यांनी सांगितले.

Updated : 25 Sep 2022 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top