येत्या काळात भाजपच्या २ नेत्यांना अटक होणार, नवाब मलिक यांचा इशारा
X
मुंबई – "काही दिवसांपासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
नवाब मलिक यांना अटक होणार आहे असे किरीट सोमय्या सांगत आहेत, पण सोमय्या यांनी ईडीचे प्रवक्ते झाल्याचे नियुक्तीपत्र घ्यावे असाही टोला मलिक यांनी लगावला आहे. खासदार असताना बोगस बिलांद्वारे पैसे उकळले, त्याचीही माहिती मी येणाऱ्या काळात बाहेर काढणार आहे, असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. आपण दररोज सकाळी दरवाज्यात पुष्पगुच्छ घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत असतो, ते आले तर त्यांचे स्वागतच करु, असेही मलिक यांनी सांगितले आहे. तुम्हाला जी काही कारवाई करायची ती करा पण बातमी पेरण्याचे काम बंद करा असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रितसर माहिती देण्याची मागणी आपण पत्राद्वारे करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
येत्या काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमिन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.






