अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; विधान परिषदेचे १० आमदार घेतील निरोप
X
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून अंतरीम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार आहे. विधानपरिषदेतील मे आणि जून या महिन्यात कार्यकाळ संपत आलेल्या १० विधानपरिषदेतील आमदारांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होणार आहे. त्याचबरोबर विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. आज निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या आता ३१ वर जाणार आहे. गेली २ दिवस विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा सरकारने ८ लाख कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आहे. सन २०२२-२३ साली हे कर्ज ६ लाख २९ हजार रूपये एवढे होते. आता पुढच्या वर्षापर्यंत आपण हे कर्ज ८ लाख कोटीपर्यंत न्यायचे ठरवले आहे. हे कर्ज कसे फेडायचे हा आमचा प्रश्न आहे. आन् तुम्ही आपल्याला १ ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे, असे सांगता, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्याच्या डोक्यावरील कर्जावरून सरकारवर टीका केली.