बेळगावच्या पराभवानंतर शिवसेनेचे चिंतन, गद्दार भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन
X
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. सामानमधल्या अग्रलेखातून भाजपला धडा शिकवण्यासाठी सर्व मराठी जनतेने एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अग्रलेखात काय म्हटले आहे ते पाहूया...
"औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!" या शब्दात भाजपवर टीका करण्यात आली आहे.
"मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळय़ात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱहाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळय़ांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱहाटी भाजप पुढाऱयांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला."
"एकजुटीची कोंडी करण्यासाठी कोरोना काळात घाईघाईने निवडणुकीचा कार्यक्रम उरकून घेतला. एकीकरण समितीने वॉर्ड रचनेवर आक्षेप घेतला, म्हणजे मराठी लोकवस्तीचे बालेकिल्ले असे काही फोडले की मराठी एकजुटीचा विजय होऊच नये. प्रचारात सहभागी होणाऱया कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. अनेक बुथवर ईव्हीएममधून कागदी स्लिपच बाहेर येत नव्हती. हे सर्व समोर आणूनही कर्नाटक प्रशासनाने निवडणूक जोरजबरदस्तीने रेटून नेली व मराठी माणसांचा पराभव घडवून आणला. भाजपास पूर्ण बहुमत मिळाले व महाराष्ट्र एकीकरण समितीस पाच जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा आनंद महाराष्ट्राला होऊच शकत नाही."
अशाप्रकारे शिवसेनेने बेळगावातील एकीकरण समितीच्या पराभवाचे विश्लेषण करत भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.






