Home > Max Political > स्त्री-पुरुष जशी दोन चाक, तस तृतीयपंथी म्हणून माझं तिसरं चाक - तृतीयपंथी उमेदवार

स्त्री-पुरुष जशी दोन चाक, तस तृतीयपंथी म्हणून माझं तिसरं चाक - तृतीयपंथी उमेदवार

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चा आहे, ती जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक गावातील एका तृतीयपंथी उमेदवाराची. अंजली पाटील ( संजना जान) असे या तृतीयपंथी उमेदवाराचे नाव असून, सध्या ती प्रचारात गुंतली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून ती निवडणुकीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांशी दोन हात करायला उतरली आहे. ' जनतेचे हीत' हा एकमेव अजेंडा घेऊन ती लोकांसमोर मतांचा जोगवा मागत आहे. प्रचारादरम्यान, लोकांचे मिळणारे प्रेम पाहून आपला आत्मविश्वास दुणावला आहे असं या तृतीयपंथी उमेदवारांच म्हणणं आहे.

स्त्री-पुरुष जशी दोन चाक, तस तृतीयपंथी म्हणून माझं तिसरं चाक - तृतीयपंथी उमेदवार
X

gram panchayatउमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष , अखेर न्यायालयाने दिली परवानगी-

तृतीयपंथी समाजातील लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच आहे , त्यांना रोजच जीवन जगतांना कायमच संघर्ष करावा लागतो. लोकशाही देशातही निवडणुकीसाठीही त्यांना संघर्षच करावा लागतो,

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अंजली (जान )हिने वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील हिच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली. निवडणूक प्रक्रियेत आता प्रचाराचा टप्पा सुरू असून, अंजली प्रचाराच्या कामात गुंतली आहे.


तृतीयपंथी अंजलीच्या उमेदवारीची राज्यभर चर्चा-

भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली या तृतीयपंथीने अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. अंजली निवडणुकीत जिंकणार का ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भादली बुद्रुकच्या ग्रामस्थांनाही अंजलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील चा फक्त 11 मतांनी पराभव झाला होता,ह्या वेळेस गावातून तसच वॉर्डातून चांगलं समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.

काय आहेत ग्रामस्थांच्या अपेक्षा -

गावातील नागरिकांना गेल्या काही वर्षपासून अंजली ताई ह्या अडचणीत असणाऱ्यांना दवाखान्याची काम स्वखर्चाने करून देतात, अस काही ग्रामस्थांच म्हणणं आहे, तर गावातील निवडून आल्यावर गावातील वॉर्डातील रस्त्यांचे काम, लाईट व्यवस्था गटारींची कामं करतील , उमेदवार कोणत्या जातीचा , पंथाचा आहे हे न पाहता आम्ही विकासकामे करणाऱ्या उमेदवाराला मत देणार आहोत. ह्या भादली गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.

आतापर्यंत भादली गावाने अनेक निवडणुका पाहिल्या. अनेकांनी गावाचा विकासाची स्वप्ने दाखवून मते घेतली, निवडूनही आले. पण गावाचा विकास काही झाला नाही. सद्या अंजली घरोघरी जाऊन मत मागत आहे.लोकांचा प्रतिसाद गेल्या निवडणुकीपेक्षा पेक्षा चांगला आहे.

मदतकार्यात नेहमी धावून येणारी अंजली , ग्रामस्थांची प्रतिक्रिया-

अंजली ही संपूर्ण गावाला परिचित व्यक्ती आहे. तृतीयपंथी असल्याने तिच्याकडे पाहण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोन नकारात्मक मुळीच नाही. ती गरजेच्या वेळी नेहमी मदतीला धावून जाते. विशेष करून, ती नेहमी वृद्धांच्या सेवेत असते. कुणाचे आजारपण असो किंवा कुणाचे शासकीय कार्यालयातील कागदपत्रांचे काम असो, कुणी हाक दिली की मदतीला जाणे हाच अंजलीचा माणुसकी धर्म. म्हणूनच तिच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे.

स्त्री-पुरुष जशी दोन चाक, तस तृतीयपंथी म्हणून माझं तिसरं चाक

अंजली पाटील (जान) उमेदवारी संदर्भात बोलताना सांगितले की, रिक्षा चिन्ह घेतलं आहे स्त्री-पुरुष हे दोन चाक आहेत तर तृतीयपंथी हे तिसरं चाक आहे म्हणून तीन चाकी रिक्षा हे चिन्ह घेतलं, गेल्या निवडणुकीत फक्त 11 मतांनी माझा पराभव झाला होता आता ह्या निवडणुकीत कसर भरून काढेल , गेली अनेक वर्षे गावाचा विकासच झालेला नाही. पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधाही ग्रामस्थांना मिळत नाहीत. ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी माझा लढा असणार आहे. मी निवडून आल्यानंतर सर्वात आधी ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वतःचा आत्मविश्वास आणि लोकांचे प्रेम याच्या पाठबळावर मी उमेदवारी केली आहे. समोर प्रतिस्पर्धी कोण आहे, याचा विचार न करता मी काय करू शकते, यावर माझा विश्वास आहे असेही तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील (जान ) हिने मॅक्समहाराष्ट्र शी बोलतांना सांगितलं.


यापुढील सर्व निवडणुका तृतीयपंथी लढवतील- शमिभा पाटील

अंजली यांच्या उमेदवारीसाठी न्यायालयीन लढा लढणाऱ्या शमिभा पाटील यावेळी म्हणाल्या की, अंजली यांच्या उमेदवारी संदर्भात आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळाला. त्यानंतर तृतीयपंथी समुदायाच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांकडून सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. अंजलीच्या लढ्यात तिच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्यच होते. आतापर्यंत आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले. पण आम्हीही याच मुख्य प्रवाहाचे घटक आहोत, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर यापुढच्या काळात अनेक निवडणुका होणार आहेत, त्यात तृतीयपंथी व्यक्तीला देखील महिला तृतीयपंथी म्हणून उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.

15 तारखेला ला मतदान-

येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व ग्रामपंचायत साठी मतदान होणार आहे. खासकरून जळगाव जिल्ह्यातील भादली ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक चार मधील तृतीयपंथी उमेदवार चा काय निकाल लागतो याकडे लक्ष लागून आहे. लोकशाही देशात तृतीयपंथी समाजालाही इतरांसारखाच अधिकार मिळतोय हे जिवंत लोकशाहीचे उदाहरण आहे.

Updated : 12 Jan 2021 3:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top