Loksatta Editorial : महिला नेतृत्वाच मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न का..?
X
Loksatta Editorial राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण टिका-टिप्पणी करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यात याच कौतुक होताना पाहायला मिळतंय. अशातच सोशल मीडियावर अनेकांचे मत-मत्तांतरे होत असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेसंदर्भात लोकसत्ताच्या संपादकीयातून (सुनेत्राताई... तुम्ही चुकलात ! अशा हेडलाईनअंतर्गत) टीका करण्यात आली आहे. पुन्हा महिलेला कर्तव्य आणि परंपरेच्या नजरेतून पाहिलं जात आहे. सुनेत्रा पवार यांच्याठिकाणी शपथ घेणारी व्यक्ती पुरुष असती तर लोकसत्ताच्या संपादकीय मध्ये अशी टीका झाली असती का? महिलांप्रती असलेली पुरुषसत्ताक मानसिकता या संपादकीयमधून पाहायला मिळतेय. याच संपादकीयावर ॲड. अमिता चाटे यांनी महिला नेतृत्वाचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे का ? असा थेट सवाल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना करत एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वरुन आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ॲड. अमिता चाटे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांच्यावर टीका होईल, याचा अंदाज आधीच होता. (१ फेब्रुवारी २०२६) लोकसत्ताच्या संपादकीय लेखातून थेट टीका करण्यात आली आहे. त्यात सुतक (शोक काळ) का पाळला नाही, असा सवाल उपस्थित केला गेला आहे. पवार कुटुंबीयांची पुरोगामी विचारसरणी प्रसिद्ध असताना, अशा परंपरेची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे अमिता चाटे म्हणाल्या.
त्यांनी पुढे म्हटले की, एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील एखाद्या नेत्याला संधी का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता तर तो योग्य ठरला असता. पण थेट महिला नेतृत्वाचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि @LoksattaLive यांना टॅग करून या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
यावेळी त्यांनी लोकसत्ताच्या संपादकीयाचा फोटोही पोस्ट केला आहे.
दरम्यान यासंदर्भात X वर विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी याला महिला विरोधी मानसिकतेचा भाग म्हटले आहे, तर काहींनी सुतक पाळण्याची गरज असल्याचे सांगितले. एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जर पुरुष नेत्याने असेच केले असते तर त्याला समर्पित म्हणून कौतुक झाले असते, पण महिलेसाठी मात्र परंपरांची आठवण होते.
महिला उपमुख्यमंत्री मॅडम यांच्यावर टीका होईल याचा अंदाज होताच…आज तर यावर संपादकीय लेख छापून आले आहेत...
— Amita Chate (@advamitachate) February 1, 2026
दुःखद घटनेनंतर ची जबाबदारी आणि पवार कुटुंबियांची पुरोगामी विचारसरणी सर्वश्रुत असताना …सुतक का पळालं नाही..? अशी विचारणा करत थेट भारतीय महिलेच्या कर्तव्याची आठवण करून दिलीय..… pic.twitter.com/joeJXoQkSe
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्ष आणि सत्तेची स्थिरता राखण्यासाठी त्वरित निर्णय घेतला गेला, असे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र विरोधक आणि काही माध्यमांनी यावर परंपरा आणि कर्तव्य यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. ही चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तापली असून, महिला नेतृत्व, परंपरा आणि राजकीय जबाबदारी यांचा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतोय.






