कैलाश विजयवर्गीय हे भाजपचे राष्ट्रीय महासचिव असून यापूर्वी ते अनेकदा वादात अडकले होते. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सोबत पश्चिम बंगालमधे रॅली करताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा व्हिडीओ विजय वर्गीय यांनी प्रसिध्द केला आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यावर सुरू असलेल्या वादामुळे भाजप सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपकडून विविध शहरांमध्ये शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील इंदुर येथे शेतकरी संमेलनाची जबाबदारी कैलाश विजयवर्गीय आणि नरोत्तम मिश्रा यांना देण्यात आली होती.
इथे भाषण करताना कैलाश विजयवर्गीय यांनी म्हणाले की, 'जोपर्यंत कमलनाथ यांचे सरकार होते, आम्ही त्यांची झोप उडवून टाकली होती. भाजप कार्यकर्ता कमलनाथ यांना स्वप्नातही दिसत असतील. नरोत्तम मिश्रा यांचे नाव तर निश्चित होते. तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटासह नरोत्तम मिश्रा यांचे स्वागत करा. या सगळ्या पडद्या मागच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे कुणाला सांगू नका, मी आजपर्यंत कुणाला हे सांगितलं नव्हतं, पहिल्यांदाच हे सांगतो आहे
की कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात कुणाची महत्त्वाची भूमिका होती तर ती नरेंद्र मोदी होती धर्मेंद्र प्रधान यांची नव्हती. पण मी हे सांगितलं हे कुणाला सांगू नका.'
या वक्तव्यावरुन आता मोठा गदारोळ उडाला असून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी याचसाठी मोदींनी लॉकडाऊन वाढवले होते का ? असे सांगत मोदींवर निशाना साधला आहे.