Home > Max Political > तामिळनाडूच्या राजकारणाची बदलती समीकरणं..

तामिळनाडूच्या राजकारणाची बदलती समीकरणं..

तामिळनाडू विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या पश्चात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या दोघांच्या जाण्याने तामिळनाडूचे राजकारण, निवडणुकीतील मुद्दे, जातीय समीकरणं कशी बदलली आहेत याचा आढावा घेणारा हर्षद विखे पाटील यांचा लेख....

तामिळनाडूच्या राजकारणाची बदलती समीकरणं..
X

सध्या सर्वांचे लक्ष आसाम आणि बंगाल या राज्याच्या निवडणुकीकडे लागले आहे. परंतू आसाम आणि बंगालच्या तुलनेने केरळ, तामिळनाडू आणि पुद्दूचेरीच्या निवडणुका इतक्या काही प्रकाशझोतात आल्या नाहीत. तामिळनाडूचे राजकारण नेहमीच तेथील नेते आणि त्याच्या प्रतिमे भोवती फिरत असलेले आपण पाहत आलो आहोत. पेरियार पासून जी तामिळनाडूची राजकीय परंपरा चालू झाली आहे मग पेरियार यांचा कालखंड असो किंवा अण्णादुराई यांचा कालखंड, असे बदल आपण पाहत आलो आहोत. त्यानंतर ज्या दोन विभागण्या झाल्या त्या म्हणजे एमजीआर रामचंद्रन, करुणानिधी. यांच्यातील राजकीय संघर्ष ते जयललिता यांचा राजकारणातील सक्रीय सहभाग ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ही व्यक्तीकेंद्रित राजकीय परंपरा चालत राहिलेली दिसते. जयललिता असतांना सक्रीय असणारे राजकारण आणि त्यांच्या मृत्यूनंतर बदललेले राजकारण आणि राजकीय पैलू, त्याच राजकीय पैलू बदलावर प्रकाश टाकणारा हा लेख.

तामिळनाडूतील नेते :

अलीकडे करुणानिधी यांचा वारसदार म्हणजे त्यांचा मुलगा स्टॅलिन मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून समोर आला. परंतू जयललिता यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा कोणीही कौटुंबिक राजकीय वारसदार नव्हता, परंतू अनेकांनी त्यांचा वारसदार असल्याचा दावाही केला, तसेच त्यासाठी तशी वातावरणनिर्मिती देखील केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने शशिकला आघाडीवर होत्या. भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर ईडी आणि सीबीआयची लागलेली चौकशीचा ससेमिरा यामुळे त्यांना तुरुंगवास झाला आणि राजकीय पटलावरून त्या दूर गेल्या. मग अण्णाद्रमुक पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी इपीएस आणि ओपीएस या दोन गटांत रस्सीखेच झाली.

शेवटी शशिकला यांच्याद्वारे इपीएसला मुख्यमंत्री केलं आणि यामुळे शशिकला तुरुंगात असतांना, अण्णाद्रमुकला इपीएसचा चेहरा मिळाला आणि आजही ह्याच एडापाडी पलानीस्वामीचा चेहरा घेऊन अण्णाद्रमुक निवडणूक लढवत आहे. काही प्रमाणात लोकाभिमुख कल्याणकारी योजनेमुळे एडपाडी पालनिस्वामी चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक प्रतिमा उभारू शकले आणि अण्णाद्रमुक सारख्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनले. शशिकला तुरुंगात असतांना देखील ते कमाल आमदार आपल्या बाजूने ठेवण्यात यशस्वी झाले आणि सुरळीतपणे काम करत, पक्ष स्थिर ठेवला, आज त्यांच्याच नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक पक्ष निवडणूक लढवत आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात एकंदरीत लोककल्याणकारी योजनांमुळे त्यांना जनतेमध्येही मान्यता मिळाली.

करुणानिधी यांच्या निधनानंतर स्टॅलिनचा चेहरा तामिळनाडूच्या जनतेसमोर आला. तसं तर स्टॅलिनला राजकारण नवे नव्हते. परंतू करुणानिधी जोपर्यंत हयात होते तोपर्यंत स्टॅलिनला हवी ती राजकीय स्पेस मिळत नव्हती. परंतु करुणानिधी यांच्या जाण्यामुळे ती स्पेस आपोआप स्टॅलिनकडे चालून आली. आता ते द्रमुक पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा ठरलेत. त्याच जोडीला आजच्या घडीला अण्णाद्रमुकपेक्षा द्रमुक पक्षाचा प्रचार हा आघाडीवर दिसतो. 2019 च्या निवडणुकांमध्ये द्रमुक आणि काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कारण त्याच्याच नेतृत्वाखाली द्रमुकला लोकसभेला देखील विजय मिळाला होता. त्यामुळे सध्या स्टॅलिन हा चेहरा, अण्णाद्रमुकच्या एडापाडी पलानीस्वामी यां चेहऱ्यापेक्षा वरचढ ठरतो आहे.

पक्ष :

जयललिता यांच्या नेतृत्वाखाली असलेला अण्णा द्रमुक पक्ष नेहेमीच सत्ताकेंद्रात राहत असलेला आहे. जयललिता यांच्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना, सर्व जातींधर्माना एकत्रित घेऊन समोर जाण्याची प्रतिमा, आणि त्यांची लोकप्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि त्यांची स्वतःची एक प्रतिमा यां चार गोष्टीमुळे अण्णाद्रमुक पक्ष नेहेमीच सत्तेत यायचा. परंतु जशा जयललिता गेल्या तशी, पक्षांतर्गत असलेली भांडणे, नेत्यांची अंतर्गत गटबाजी, तसेच त्यांची फिस्कटलेले जातीय समीकरणं यामुळे अण्णाद्रमुक पक्षाची बरीच वाताहत झाली आहे. त्याचाच परिणाम आताच्या घडीला चाललेल्या पक्षाच्या प्रचारावर होताना दिसून येत आहे.

करुणानिधी यांच्यासारखं संघटन कौशल्य, तसेच त्यांच्या सारखी प्रतिमा जरी स्टॅलिनकडे नसली तरी, स्टॅलिनने समविचारी पक्षांना सोबत घेऊन बांधलेली आघाडी, लोकसभेत त्यांना मिळालेला विजय असो किंवा अण्णाद्रमुक पक्षांची होत असलेली वाताहत, यामुळे द्रमुक पक्षाला याचा फायदा होत आहे. तसेच जातीय समीकरण आणि तसेच आघाड्या ह्या द्रमुक पक्षाच्या सोयीने जुळून येत आहेत. त्यामुळे स्टॅलिनच्या नेतृत्वाचे अजून बळकटीकरण होत आहे.

जातीय समीकरण :

तामिळनाडूतील राजकारण नेहेमीच गाउंडर, थेवर, नाडार, वानीयार या प्रमुख चार जातींभोवती फिरत राहीले आहे. अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांनी वरील जातींना नेहमीच आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्या बरोबर अल्पसंख्याक व अनुसूचित जाती व जमाती यांची देखील मोटबांधणी करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत आला आहे. जयललिता ह्या जातीने जरी ब्राम्हण असल्या तरीही त्यांनी तिथील ज्या जाती लोकसंख्येने जास्त आहेत त्यांची नेहेमीच मोट बांधली होती. त्यासोबत छोट्या समूहाने असलेल्या जातींना अण्णाद्रमुककडे वळविण्यात यशस्वी झाल्या होत्या. तसेच तेथील थोडेफार वर्चस्ववादी समजल्या जाणाऱ्या गाउंडर आणि थेवर ह्या दोन्ही जाती जयललितांच्या काळात अण्णाद्रमुक पक्षासोबत राहिलेल्या आहेत. आताही या जातीची मते त्याच पक्षाकडे जाताना दिसून येत आहे. शशिकला या स्वतः थेवर या जातीमधून असल्या कारणाने त्या जातीचे मतदान अण्णाद्रमुकला होतं. यां जोडीला आताचे जे मुख्यमंत्री आहेत एडपाडी पलानिस्वामी हे गाउंडर जातीचे असून, गाउंडर समाजाचे मतदान प्रामुख्याने अण्णाद्रमुक पक्षाकडे जाऊ शकते. तसेच अण्णाद्रमुकचे कमाल मंत्री हे गाउंडर जातींचे असल्यामुळे यां जातींचे संपूर्ण मत हे या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. परंतु शशिकला यांना अण्णाद्रमुक पक्षातून होणाऱ्या विरोधामुळे त्यांच्या थेवर जातीच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. हा फटका अण्णाद्रमुक पक्षाला बसू शकतो, कारण येडापाडी गटांनी शशिकला यांच्यावर अन्याय केला आहे ही त्यामागची धारणा थेवर मतदारांमध्ये पसरलेली दिसते. इतर छोट्या जात समूहाला आपल्याकडे खेचण्याचा अण्णाद्रमुक पक्षाचा प्रयत्न चालू आहे. परंतु अण्णाद्रमुक आणि भाजपची असलेली आघाडी असल्याने ख्रिश्चन आणि मुस्लिम गटाचे आजच्या घडीला अण्णाद्रमुक पक्षाला न मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

अण्णा द्रमुक व भाजपाच्या आघाडीमुळे ख्रिश्चन व मुस्लिम धर्माचे मतदान हे द्रमुक पक्षाकडे वळण्याची शक्यता आहे. द्रमुक पक्षाला 2019 च्या लोकसभेपासून जातीय समीकरणाची मोट बांधण्यामध्ये ते यश मिळाले आहे. त्या त्या भागातल्या संख्येने प्रमुख जाती त्याला जोडून, मागासवर्ग, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक गट याला जोडण्याचं काम द्रमुकने केले आहे. त्या जोडीला काँग्रेस पक्ष असल्याने या सर्व जाती समूहांची मोट घट्ट होत गेली आगे. त्यामुळे अनुसूचित जातींचे मतदान देखील द्रमुकडे वळणार असे दिसते.

कमल हसन यांची एन्ट्री :

सिनेसृष्टीतील अभिनेत्यांनी नेहमीच तामिळनाडूतील राजकारणात रस घेतलेला आहे. जवळपास प्रत्येक गाजलेल्या अभिनेत्यांनी आपापले नशीब राजकारणात आजमावून पाहिले आहे. त्यात काही यशस्वीही झाले आणि काही अयशस्वी झाले. त्याच यादीतले अजून एक नाव म्हणजे कमाल हसन होय. त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील स्वतःचं नशीब आजमावले, परंतु त्यात, त्यांना म्हणावं तेवढं यश प्राप्त झालं नाही. परंतु तेथील शहरी भागातला युवा मतदार वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वीपणे केला आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत कमल हसन यांनी सुशासन आणि विकास कामे यावर जोर देत राजकीय क्षेत्रात आपले नाव आणि लोकप्रियता आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही त्यांना पाहिजे तसे यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. परंतू प्रथम मतदान करणारा शहरी युवा मतदार त्यांच्याकडे वळू शकतो आणि किती प्रमाणात तो वळतो हे बघणं महत्वपूर्ण ठरेल.

तामिळनाडूतील ज्या निवडणुका कधीकाळी व्यक्तिकेंद्रित असायच्या तसेच तेथील नेत्यांच्या लोकप्रियतेवर असायच्या तसेच, सिनेसृष्टीतील व्यक्तीने प्रभावित असलेल्या असायच्या त्याच निवडणुका आता या वेळेला जातीय समीकरण, तेथील स्थानिक प्रश्न आणि समस्या, प्रादेशिक पातळीवरचे मुद्दे, विकास कामे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोण कशी आघाड्यांची जुळवणी करत या मुद्यांभोवती फिरताना दिसत आहे. 2019 चा लोकसभेचा निकाल पाहता, जातीय समीकरणांमध्ये अण्णाद्रमुक पक्षापेक्षा, द्रमुक पक्ष वरचढ ठरतोय. तसेच एडापाडी आणि स्टॅलिन यांच्यामध्ये चुरशीची लढाई दिसून येत आहे. तरीही करुणानिधी आणि अण्णादुराई यांचा त्याकाळात जेवढा करिष्मा होता तेवढा स्टॅलिन आणि एडपडी यांचा नाही हे दिसून येते. आता जरी जमेची बाजू स्टालिन यांची दिसून येत असली तरी निकालांनंतर लोकांचा कौल समजू शकेल.

Updated : 6 April 2021 6:38 AM IST
Next Story
Share it
Top