Home > Max Political > माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा, मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार

माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा, मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार

मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावातून सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा, मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
X

मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणासाठी तीनशे एकरचं मैदान तयार करण्यात आलं होतं. येथून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, केंद्र सरकारने व्यवसायावरून आरक्षण दिलं. त्यामध्ये विदर्भातील मराठा समाज शेती करतो म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीमधून आरक्षण दिलं. पण मराठवाड्यातील मराठ्यांसह इतर मराठ्यांना कुणबी पुरावे नसल्याचे कारण देत आरक्षण नाकारले. त्यामुळेच मी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सरकारने मराठ्यांना एक महिन्याची मुदत मागितली. ही मुदत आता संपत आली आहे. त्यामुळे सरकारने 20 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही, तर 22 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. या लढाईत माझा जीव गेला तरी हरकत नाही. एक तर मराठा समाजाला आरक्षण मिळून त्याची विजययात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हुंकार भरला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, दहा दिवसात आरक्षण द्या, अन्यथा त्यापुढची मराठा समाजाच्या आंदोलनाची जबाबदारी तुमची. एवढंच नाही तर आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

मराठा समाजाने उद्रेक करू नये, कुणी कितीही उकसून दिलं तरी उसकू नका, आरक्षण कसे देत नाहीत ते आपण पाहूच. त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.



Updated : 14 Oct 2023 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top