Home > Max Political > फडणवीस यांच्या ट्वीटला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रत्युत्तर

फडणवीस यांच्या ट्वीटला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रत्युत्तर

फडणवीस यांच्या ट्वीटला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रत्युत्तर
X

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमीत्ताने 14 ट्वीट करत टीका केली होती. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिलला 14 ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर टीका करणे हा आता छंद झाला आहे. तसेच शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय भुमिका सगळ्या जनतेला माहित आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ट्वीट करून काहीही फायदा होणार नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध जोडण्याच्या प्रकाराबद्दल दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांची केस ही पीएमएलए कायद्यापुर्वीची आहे. तरीही या प्रकरणाचा ओढून ताणून दाऊदशी संबंध जोडला जात आहे. त्यामुळे त्या आरोपातही मला काही तथ्य दिसत नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

काय आहेत देवेंद्र फडणवीस यांचे 14 ट्वीट-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 रद्द करण्याबाबत घेतलेल्या भुमिकेचे फडणवीस यांनी शरद पवार यांना स्मरण करून दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना राष्ट्रवादीने घेतलेल्या भुमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे.

तसेच शरद पवार विविध विधाने करत असतात. त्यामुळे त्यांचे काश्मीर फाईल्सवरचे विधान आश्चर्यकारक नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच ते राष्ट्रवादीच्या ध्रुवीकरणाच्या ट्रॅक रेकॉर्डशी संबंधीत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

राष्ट्रवादीची धार्मिक ध्रुवीकरणाबाबतची भुमिकेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा दाखला दिला आहे.

2013 मध्ये इशरत जहाँ प्रकरणात शरद पवार यांनी ती निर्दोष असल्याचे विधान केले होते.

शरद पवार इशरत जहाँला फक्त निर्दोष आहे एवढेच म्हणाले नाही तर त्यांनी तिला मदतीचा हात पुढे केला. याबरोबरच शरद पवार यांनी IB ला बदनाम करण्याचाही प्रयत्न केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

2012 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत असताना आझाद मैदान येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीने रझा अकादमी विरोधात मवाळ भुमिका घेत मुंबईचे आयुक्त बदलल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

संविधानात धर्मानुसार कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची तरतुद नसताना मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मालेगाव बाँबस्फोटानंतर शरद पवार यांनी हिंदू दहशतवाद ही नवी संकल्पना मांडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राजकीय पक्षांनी सुधारणांची अंमलबजावणी करणे ही आदर्श गोष्ट आहे. मात्र शरद पवार यांनी आधी सच्चर समितीच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला.

12 मार्च 2012 रोजी मुंबईत 12 बाँबस्फोट घडले होते. मात्र त्यावेळी 13 वा बाँबस्फोट मुस्लिम वस्तीत घडल्याचे सांगत शरद पवार यांनी कायदा सुव्यवस्थेऐवजी धार्मिक तुष्टीकरणाला महत्व दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

यावेळी फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जातीय सलोख्याची अपेक्षा असताना राष्ट्रवादीचा असा दुटप्पीपणा का? काश्मीरी पंडितांच्या दुःखाची खरी कहाणी सांगणारा चित्रपट फक्त त्यांच्या नकली धर्मनिरपेक्ष अजेंड्याशी जुळत नाही म्हणून काश्मीर फाईल्स चित्रपटाला विरोध का? असे सवाल उपस्थित केले आहेत.

पुढे फडणवीस म्हणाले, काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तर हा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या विरोधात आहे. ज्यामुळे त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकीय अजेंड्याला धक्का लागू शकतो. त्यामुळे त्यांचा फुट पाडण्याचा प्रकार सुरू आहे.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशात असा प्रकार स्वीकारार्ह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी थ्रेड संपवला. त्यामुळे राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

Updated : 14 April 2022 3:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top