शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
X
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने सीमाभागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये या घटनेचा निषेध केला जातो आहे. पण यावर आतापर्यंत राज्यातील भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना निमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कर्नाटकमध्ये किंवा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, कर्नाटकच्या सरकारनेही या घटनेवर भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचाही विपर्यास केला गेला, असे सांगत फडणवीस यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली. पण त्याचबरोबर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निवडक निषेध का केला जातो, असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच सत्ताधारी पक्षाचे आमदार बूट घालून महाराजांच्या पुतळ्यावर चढले होते याची आठवण करुन देत तेव्हा मूग गिळून गप्प का बसले होते अशी टीका केली.
यावेळी फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरुनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाचे कारण देत सरकारने आताही अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. संसदेचे अधिवेशन फार काळ चालते, मात्र महाराष्ट्रात अधिवेशन घेण्याची मानसिकताच नाही या सरकारने लोकशाही बंद केली आहे. तसेच इथे आता फक्त रोकशाही आणि रोखशाही सुरू आहे, या शब्दात फडणवीस यांनी टीका केली.






