मिस कॉलद्वारे फसवून भाजप बनला एक नंबरचा पक्ष – नाना पटोले
X
मुंबई : राज्यात बुधवारी नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र भाजपचा हा दावा फेटाळत जोरदार टीका केली आहे.
"राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत," असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
"नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिला असून भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी ६०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या त्या आता ३०० वर खाली घसरल्या आहेत. आम्ही १७ नगरपंचायतीवरून २२ वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे." असा दावाही पटोले यांनी केला आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत, तरीसुद्धा काँग्रेसला चांगले यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. "भंडा-याचा निकाल अजून येत आहे, तिथेही काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील आणि सत्ता स्थापन करेल" असा दावा त्यांनी केला.
"काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता हे जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिले आहे. स्वबळावर निवडणूक लढवल्यामुळे पूर्वी आघाडीमुळे आम्ही जिथे निवडणुका लढवत नव्हतो तिथेही आता काँग्रेस संघटना वाढणार आहे" असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. "भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे हा त्यांचा दावाच हास्यास्पद आहे. मिस कॉलद्वारे फसवून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजपा जगातील पहिला पक्ष आहे. जनता त्यांचा भूलथापांना बळी पडत नाही हेच नगरपंचायतीच्या निकालावरुन दिसून आले आहे" असा टोलासुद्धा नाना पटोले यांनी लगावला आहे.