Home > मॅक्स ब्लॉग्ज > दिल्लीत आंदोलन, मोदी शहा येणार अडचणीत

दिल्लीत आंदोलन, मोदी शहा येणार अडचणीत

दिल्ली व्यापक आंदोलनाच्या उंबरठ्यावर, मोदी शहांच्या अडचणी वाढणार, बाळासाहेब पवार यांचे विश्लेषण

दिल्लीत आंदोलन, मोदी शहा येणार अडचणीत
X

अण्णा आंदोलन, शेतकरी आंदोलन याच्या धर्तीवर दिल्लीत महिला खेळाडूंनाच्या शोषणाच्या मुद्द्यावर सुरु झालेले आंदोलन हळू हळू व्यापक स्वरूप धारण करत आहे . निवडणुकीत कोंडी झालेले मोदी व शहा सरकारला महिला, शेतकरी ,पुलवामा शाहिद सैनिक मुद्दा व सत्यपाल मलिक यांचा स्वच्छ चेहरा तर शेतकरी आंदोलनाचे बौद्धिक नेतृत्व घेरणार आहे . या आंदोलनाची पार्श्वभूमी व पुढची दिशा कशी असेल याचा आढावा घेतला आहे जेष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांनी

कर्नाटक विधानसभा निवडणूक व त्यानंतरच्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी यांची कसोटी पाहणाऱ्या आहेत . भाजपाला निवडणुका जिंकून देणारा चेहरा एकटे मोदी आहेत. दुर्दैवाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील पंतप्रधान विकासाच्या मुद्द्यावर न बोलता हुकूमशाहा प्रमाणे जनतेला भावनिक मुद्द्यात अडकवून ठेवत आहे. परंतू दिल्लीत असे अनेक प्रश्न व आंदोलने येत्या काही दिवसात उभी राहतील ज्याचे उत्तर मोदी देऊ शकणार नाहीत. राजकीय पक्षावर आरोप करताना काहीही बोलता येते, परंतु जेव्हा जनता समोर उभी राहते तेव्हा अवघड होते . माफी माघून कायदे माघे घ्यावे लागतात, हे देशाने पाहिले आहे.

नरेंद्र मोदी आता लागोपाठ चक्रव्यूहात अडकत चालले आहेत. त्यांच्या बाजूने कोणी उभा राहत नाही व ते प्रचार सोडून दुसरे कोणतेच काम करत नाहीत . दिल्लीत महिला ऑलिंम्पिक विजेत्या पैलवान जंतर मंतर वर धरणे आंदोलन करत आहेत. मोदी शहा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जाट विरुद्ध राजपूत असा रंग देण्याचा असफल प्रयत्न करताना दिसत आहेत किंवा त्यांच्यावर योगी आदित्यनाथ यांचा दबाव आहे. योगी आदित्यनाथ कसल्याही परिस्थितीत ठाकूर लोकांना वाचवत राहतात. त्यामुळे मोदींचे धाडस होत नसावे. परंतू हे वादळ घोंगवणार आहे. हा देशातील संपूर्ण महिलांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या मुली अगोदरच जंतर मंतरवर जाऊन बसल्या आहेत व त्यांना मोठे समर्थन मिळताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हा मुद्दा मनावर घेतला आहे. उत्तर भारतात असलेल्या खाप पंचायतीची ताकत मोदींनी अनुभवली आहे परंतू अरोपी दररोज पत्रकार परिषदा घेत आहे. दिल्लीत या महिला खेळाडूबद्दल शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी जो बळाचा वापर पोलिसांनी केला व त्यानंतर जे वादळ उभा राहिले तशीच चूक आज परत एकदा मोदी शहा करत आहेत. त्यांनी त्या खेळाडूंना तिथे त्रास दिला. संपूर्ण हिंदी बेल्ट घोंगावत दिल्लीत उतरेल. ते सरकारच्या हाताबाहेर जाईल. हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या भागात खाप पंचायती येत्या दोन दिवसात पुन्हा आंदोलनात उतरतील हे निश्चित झालेले दिसते. शीख समुदाय जो भारतीय किसान युनियन बरोबर आहे. ते सात मे पासून महिलाचे आंदोलन करत आहेत व मोदी शहा कर्नाटक निवडणुकीत भावनिक मुद्दा घेत प्रचार करत होते. त्यांना तिथे काँग्रेसच्या नेतृत्वाने कोंडीत पकडले आहे. तर दिल्लीत मोठ्या आंदोलनाची सुरुवात होत आहे. तसे पाहता हे आंदोलन अतिशय सहज संपले असते. आता ते लांबत जाईल असे दिसते. एका आरोपीला तुरुंगात टाकणे ही अतिशय साधी घटना आहे. तो कोणी महात्मा नाही त्याला वाचवत मोदी सरकार नक्की अडचणीत येईल. देशातील सर्व खेळाडू व शेतकरी व माजी सैनिकांनी हे आंदोलन हाती घ्यायला हवे व त्याची व्याप्ती वाढवत नेली पाहिजे. नसता आता हुकूमशाही लादल्याशिवाय मोदी शहा थांबणार नाहीत.

मोदी व शहा देशातील सर्वात अस्वस्थ नेते आहेत. ते पत्रकार व जनतेचा समोरा समोर सामना करत नाहीत. या प्रकरणात मोदी शहाची पक्षांतर्गत सुद्धा गोची होत आहे. जर या आंदोलनाने जोर पकडला व व्यापक स्वरूप मिळाले तर मोदी शहा विरुद्ध पक्षातर्गत सुद्धा बंड होणार हे निश्चित. कारण हा पक्ष ते दहशतीने चालवत आहेत. याच प्रकरणाचा या दृष्टीने विचार केल्यास एक आरोपीसमोर एक तर मोदी शहा हतबल आहेत किंवा योगी चे राजकारण अडवण्यासाठी ते कर्नाटकच्या निवडणुकीनंतर खेळी खेळतील, असे असले तरी हे आंदोलन मोदींना हळूहळू मोठ्या चक्रव्युहात अडकवत नेणारे ठरेलं हे नक्की.

या आंदोलनाला जोडूनच या मुली ज्या शेतकरी कुटूंबातून येतात त्या हिंदी पट्ट्यातून सर्वात जास्त लोक सैन्यात आहेत किंवा होते. ते अग्निवीर मुळे संतापलेले आहेत. देशात हुकूमशाही लादताना भारतीय सैन्य आडवे येऊ नये म्हणून कमजोर सैन्य तयार करण्याचा प्रयत्न आहे. इतर हुकूमशहांना इतर देश जिंकायचे होते. त्यांनी सैन्य मजबूत बनवले मोदी शहांना देशावर राज्य करायचे आहे व पाकिस्तानसारखा लष्करी हस्तक्षेप होऊ नये, म्हणून अग्निवीर योजना आणली आहे. त्यामुळे या पट्ट्यात असंतोष आहेच.

सत्यपाल मलिक यांनी पुलवामा शाहिदांबद्दल जो मुद्दा लावून धरला आहे तो सैन्याशी संबंधित आहे. पुलवामा ,सर्जिकलं स्ट्राईक याचं प्रश्नावर मोदी शहांनी निवडणूक जिंकली. त्यातील वास्तव त्याच राज्याचे राज्यपाल मांडत आहेत. त्यांना मोदी शहा उत्तर देऊ शकले नाहीत .

सत्यपाल मलिक उपस्थित करत असलेला शहीद जवानांचा मुद्दा मोदी यांच्या राष्टप्रेमी प्रतिमेला तडा देणारा आहे. राजकारणासाठी सैनिकांचा बळी घेतला गेला. त्यांना विमान सेवा उपलब्ध करून दिली नाही नसता हे बळी गेले नसते. शिवाय असा हल्ला होणार आहे हे गुप्तचर यंत्रणेला माहिती देऊन दुर्लक्ष केले गेले ही बाब गंभीर आहे व ते मांडणारी सत्यपाल मलिक ही व्यक्ती त्याकाळी तिथे राज्यपाल होती. शिवाय सत्यपाल मलिक ही व्यक्ती राजकारणात असली तरीही ती स्वच्छ प्रतिमेची आहे. लोहिया आंदोलनातून पुढे येत चौधरी चरणसिंह यांच्याबरोबर काम केले आहे. कसलीही संपत्ती कमावली नाही.

अण्णा मंदिरात राहतात पण पक्के राजकारणी आहेत. सत्यपाल मलिक राजकारणात राहून स्वच्छ आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे. कोणत्याही व्यापक आंदोलनाला एक स्वच्छ चेहरा लागतो. तसा चेहरा सत्यपाल मलिक नक्की आहेत. शिवाय राजधानीच्या बाजूचा परिसर त्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यांना व्यापक जनसमर्थन मिळू शकते व पुन्हा एकदा अण्णा आंदोलनाच्या वळणावर देश येऊ शकतो .

अण्णा आंदोलन ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सुरु झाले व सत्तांतर झाले हे आंदोलन किती फसवे व कसे प्रायोजित होते हे नंतर स्पष्ट झाले . कोणी अण्णांना फसवले का? अण्णा राजकीय क्षेत्रात नव्हते म्हणून वापरले गेले हे दोन्ही उत्तरे असू शकतात. पण तोच मुद्दा आज सर्वात गंभीर आहे. पण मोदींपर्यंत या गोष्टी जात नसाव्यात. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा राजधानीत आंदोलन उभे राहत आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येऊ शकतो .

या खेळाडू मुली जंतर मंतरवर पोहचल्या आहेत. त्यामुळे कोणाला अडवण्याचा प्रश्न येत नाही. या शेतकरी वर्गातील आहेत. या अगोदरचे शेतकरी आंदोलन जगाने पाहिले आहे. शेतकरी सरकारला पुरून उरले. राकेश टीकैत, युद्धवीर सिंह, हननं मौला ,दर्शनपाल , योगेंद्र यादव ही मंडळी माध्यमांना पुरून उरली होती. ती पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मोदींना एकदा माफी मागायला लावली. परंतु उत्तरप्रदेश निवडणुका झाल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांकडे लक्ष दिले नाही. किसान, किसान की बेटी आणि किसान का शहिद बेटा या तीन मुद्द्यावर हे आंदोलन निर्णायक वळणावर येऊ शकते. या आंदोलनात शेतकरी आंदोलना पेक्षा मोठा सहभाग महिलांचा असणार आहे .

शेतकरी आंदोलन ज्या अदानीच्या मुद्द्यावर झाले जे काळे कायदे शेतकरी विरोधी होते. त्या अदानींच्या बाबतीत मोदी एक ही शब्द बोलत नाहीत. पण हे कायदे मागे घेताना त्यांना माफी माघावी लागली हे ते विसरणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे ते या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतील. तेवढे हे आंदोलन आणखी व्यापक बनेल याला महिला अस्मिता, सैन्य अस्मिता हे मुद्दे जोडीला आले आहेत. सत्यपाल मलिक यांच्यासारख्या चेहऱ्यावर कोणाचा आक्षेप असू शकत नाही व असणार नाही. त्यांची भूमिका खंबीर आहे. कसलीही मालमत्ता नाही. त्यामुळे ते दबावाला बळी पडणार नाहीत. ते निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले करणे मोदी शहा यांना कठीण जात आहे .

सत्यपाल मलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाहीत. मोदी बोलत नाहीत. संघसुद्धा सत्यपाला मलिक यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. राम माधव व दीडशे कोटी लाच प्रकरणाने संघ मागे सरकला आहे. त्यामुळे ते ही उत्तर देऊ शकत नाहीत . सर्व प्रवक्ते गायब झाले आहेत. तर महिला खेळाडू शोषण प्रकारणातील आरोपी दररोज माध्यमांना मुलाखती देत आहे. ही परिस्थिती आणखी चिघळत आहे. मोदी व शहा माझ्यावर काहीही कारवाई करू शकत माहित हे ही तो दररोज सिद्ध करत आहे. यातून मोदी शहा विरुद्ध योगी आदित्यनाथ हा छुपा संघर्ष , दिल्लीत नवीन आंदोलनाला जन्म घालत आहे . महिला खेळाडू च्या प्रश्नावर हे सरकार जेवढे ताणत् जाईल तेव्हडे शेतकरी व माजी सैनिक व बेरोजगार या आंदोलनात उतरतील .

या सर्व प्रकारात मोदी तीच ऐतिहासिक चुक करत आहेत. जी मनमोहन सिंग यांनी केली. त्यांनी त्यावेळी केलेल्या खऱ्या खोट्या कोणत्याच आरोपाला उत्तर दिले नाही. हा आरोपी जसे नको ते बोलतो तसे दिग्विजय सिह व मंडळी बोलत गेली व अण्णा आंदोलन व्यापक बनले. तसेच काही घडून एक आंदोलन उभे राहत आहे. हे आंदोलन फक्त सत्तांतर करणारे नसावे तर लोकशाही बळकट करणारे, महिला सुरक्षा , शेतकरी मागण्या पूर्ण करणारे व सैन्याला राजकारणा पासून दूर ठेवणारे असावे व असेल असे वाटते. कारण शेतकरी आंदोलनाचे नेते ज्या एक जुटीने लढले तेच नेतृत्व करतील असे दिसते . मोदी शहा यांना येणारे एक वर्ष खूपच आव्हानात्मक असणार आहे हे नक्की.

Updated : 14 May 2023 2:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top