Home > मॅक्स किसान > हुतात्म दिन: शेतकरी केंद्र सरकारचा विरोध म्हणून एक दिवस उपवास करणार...

हुतात्म दिन: शेतकरी केंद्र सरकारचा विरोध म्हणून एक दिवस उपवास करणार...

हुतात्म दिन: शेतकरी केंद्र सरकारचा विरोध म्हणून एक दिवस उपवास करणार...
X

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे. या मागण्यांसाठी दिल्ली येथे दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, हे आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

भाजपशी संबंधित असलेला अभिनेता दीप सिद्धू व संयुक्त किसान मोर्चाचा भाग नसलेल्या व आंदोलनात गडबड घडवून आणण्यासाठीच आंदोलनात उतरविण्यात आलेल्या किसान मजदूर संघर्ष कमिटीला हाताशी धरून भाजपच्या केंद्र सरकारने 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. लाल किल्ल्यावरही अत्यंत आक्षेपार्ह कृत्य केले. असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ अभूतपूर्व ट्रॅक्टर मार्च काढला होता. एक लाख ट्रॅक्टर व सात लाख शेतकरी या ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी झाले होते. मात्र, भाजपच्या आय टी सेलने ट्रॅक्टर मार्चकडे देशवासीयांचे लक्ष जाऊ नये. यासाठी दिल्ली येथे दीप सिद्धू, किसान मजदूर संघर्ष कमिटी आणि पोलीस यांनी घडविलेला हिंसाचार चित्रित करून तो देशभर प्रसारित केला. असं मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केलं आहे.

शेतकऱ्यांचे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेले शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे. या षडयंत्राचा भाग म्हणूनच हे सारे करण्यात आले. दुसऱ्या दिवशी या रणनीतीनुसार पलवल बॉर्डर व गाजीपुर बॉर्डरवर सरकारने पोलीस बळाचा वापर करून येथे बसलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. गाजीपूरमध्ये हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. असा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हिंस्र व कुटील मार्गाचा अवलंब केला आहे. जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन व सी.ए.ए. विरोधातील दिल्ली आंदोलन सरकारने अशाच प्रकारे हिंसेचा वापर करत मोडून काढले होते. सरकार व भाजप आता शेतकऱ्यांचे आंदोलनही याच प्रकारे हाताळत आहे. असं मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या कृतीचा धिक्कार करत असल्याचं मत या शेतकरी संघटनांनी व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारचं शेतकऱ्यांबाबत धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी महात्मा गांधी यांच्या हौतात्म्यदिनी दिनांक 30 जानेवारी 2021 ला देशभर एक दिवसाचा उपवास करून, सभा घेऊन, धरणी धरून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी व समाजसेवी संघटना सरकारच्या या कारस्थानाचा जोरदार निषेध करणार आहेत.

महाराष्ट्रातही सर्वत्र अशा प्रकारे निषेध करण्याचे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि सर्व समविचारी संघटनांनी केले आहे

Updated : 29 Jan 2021 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top