नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस, हातचं पीक गेलं…
X
नांदेड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांवरील शेंगांना मोड फुटले आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर मुगाच्या पिकाचं मोठं नुकसान होणार अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. मुगाचा प्रचंड पेरा असलेल्या बिलोली तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या कष्टाने शेती केली आहे.

१० – १२ दिवसांपूर्वीच परीसरातील मुग वरपणीला आला होता. साधारणपणे पोळ्याच्या दरम्यान मुग काढणीला नेहमी सुरुवात होते. माञ त्याच दरम्यान सुरु झालेला पाऊस कांही थांबायचे नाव घेत नाहीये. दहा दिवसांपासुन संततधार असलेल्या पावसाने शेंगा खाली पडून मातीत मिसळल्या गेल्या. तर उभ्या पिकाच्या शिल्लक शेंगाना मोड फुटले आहेत.

सततच्या पावसाने हिरवेगार दिसणाऱ्या मुगाचा रंग तांबडा झाला आहे. बहुतांश शेतक-यांचे मुग कुजल्याने बुरशी लागली आहे. पावसाच्या उघडीपीनंतर मुग काढण्याच्या शेतकऱ्यांच्या मनसुब्यावर पावसाने पाणी फेरले आहे. आता मूग निघण्याची शक्याताच आता माळवली आहे. हातातोंडाशी आलेला मूग गेल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. पिक विम्याअंतर्गत लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.







