Home > मॅक्स किसान > राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना झापले म्हणाले माफी मागा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपाल तापले

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना झापले म्हणाले माफी मागा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपाल तापले

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना झापले म्हणाले माफी मागा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपाल तापले
X

मेघालय चे राज्यपाल आणि एके काळी भाजपचे नेते राहिलेल्या सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा कृषी कायद्याचा मुद्द्यावर केंद्र सरकारसह हरियाणा सरकारवर सडकून टीका केली आहे.

शनिवारी हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्ज मध्ये जवळपास दहा लोक जखमी झाले. दरम्यान शेतकऱ्यांनी हरियानातील कर्नालकडे जाणारा महामार्ग रोखला होता. शेतकरी भाजपच्या सभेला विरोध करत होते. ज्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, प्रदेश भाजपा प्रमुख ओम प्रकाश धनखड़ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी माफी मागावी. तसंच लाठीचार्ज चा आदेश देणाऱ्या करनाल च्या सब डिवीज़नल मजिस्ट्रेट ला पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकार ने बळाचा वापर केला नाही. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे. तसंच अधिकाऱ्यांना बळाचा वापर करु नये अशा सूचना दिल्या आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. सब डिवीजनल मजिस्ट्रेट ला तात्काळ पदावरून दूर करायला हवं. तो त्या पदाचा लायक नाही. सरकार त्याची मदत करत आहे.

अशा शब्दात त्यांनी हरियाणा सरकारवर निशाणा साधला आहे.

ते 'एनडीटीवी' शी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले,

"या आंदोलनात 600 शेतकरी मेले आहेत. मात्र, सरकारने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माझ्या या वक्त्यव्यावर मला सरकारची काळजी नाही.''

माझं या पदावर प्रेम नाही. मी जे काही करतो ते मनापासून करतो. मी शेतकऱ्यांच्या मध्ये परत जाऊ इच्छितो.

सत्यपाल मलिक यांनी या अगोदर जम्मू-कश्मीर, बिहार आणि ओड़िशा चे राज्यपाल पद सांभाळलेले आहे. राज्यपाल हे पद गैरराजकारणी असते. त्यांनी राजकीय वक्तव्य करु नये. अशी साधारणपणे अपेक्षा केली जाते.

मात्र, या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भाजपला त्यांनी इशारा दिला आहे. हे आंदोलन असंच सुरु राहिलं तर पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा मध्ये भाजप चा पराभव होईल. असं मत सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केलं आहे.





काय आहे संपुर्ण प्रकरण?

हा लाठीचार्ज होण्यापूर्वी, व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, कर्नाल जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा, पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांचे डोके फोडण्याची सूचना करताना दिसत आहेत. ते पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत की, कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही किंमतीत मर्यादेच्या पुढे जाण्याची परवानगी देऊ नये, मग त्यांची डोकी फोडावी लागली तरी चालेल.

व्हिडीओमध्ये आयुष सिन्हा यांना असं बोलताना ऐकू येतं की, "जर मला तिथे एकही आंदोलक दिसला तर मला त्याचं डोकं फुटलेले पाहिजे आणि हात तुटलेले पाहिजे."

ते म्हणतात, " गोष्ट खूप सोपी आहे. कोणीही असो, कुठलाही असो, कोणालाही तिथे पोहोचण्याची परवानगी नाही. आपल्याला कोणालाही ती सीमा पार करू द्यायची नाही.

ज्याठिकाणी भाजपची बैठक होती. त्या ठिकाणी हरियाणा पोलिसांनी शनिवारी महामार्गावर धरणे लावून वाहतूक बंद करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारने नवीन शेतकरी कायदे आणल्यापासूनच शेतकरी भाजप नेत्यांचा विरोध करत आहेत. या सोबतच ते भाजपच्या सभांचा देखील विरोध करत आहेत. आणि यामुळेच जेव्हा शनिवारी भाजप नेत्यांची बैठक होणार होती. त्यावेळी शेतकरी नेत्यांनी महामार्ग रोखला. आणि याबाबतच एसडीएमने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

जेव्हा एसडीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अधिकाऱ्याच्या त्या आदेशावर टीका झाली. या निषेधाचा परिणाम असा झाला की, सत्ताधारी भाजपच्या लोकांनीही अधिकाऱ्याच्या आदेशावर टीका करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट केले,

"मला आशा आहे की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि डीएमने तसं काहीही म्हटलेलं नाही. अन्यथा भारतासारख्या लोकशाही देशात स्वतःच्या नागरिकांशी अशी वागणूक स्वीकारली जाऊ शकत नाही."

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटलं की,

"खट्टर साहेब, आज तुम्ही हरियाणाच्या आत्म्यावर लाठ्यांचा वर्षाव केला आहे. येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील की हरियाणातील शेतकऱ्यांचे रक्त रस्त्यावर सांडले होते."

त्यांनी शेतकऱ्यांवरील या कारवाईची तुलना जनरल डायरच्या कारवाईशी केली.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग आणि अनेक रस्ते अडवले. हरियाणातील इतर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता जाम असल्याने दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांच्या अटक केलेल्या साथीदारांना रात्री सोडले आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी जाम केलेला रस्ताही उघडला.

संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले आहे. शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनी यांनी म्हटले आहे की, पोलीस गुंडगिरी करत आहे आणि आम्हाला त्याचा ठामपणे विरोध करावा लागेल.

त्यांनी म्हटलं आहे की, आजूबाजूचे सर्व रस्ते आणि टोल जाम करून टाका.

Updated : 29 Aug 2021 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top