Home > मॅक्स किसान > वाढत्या तापमान वाढीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, संशोधनातून समोर आली गंभीर बाब

वाढत्या तापमान वाढीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, संशोधनातून समोर आली गंभीर बाब

वाढत्या तापमानाची झळ आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही बसणार, शेतकऱ्यांच्या पिकात होणार मोठी घट, कोणत्या पिकांना बसणार फटका? कुठं दुष्काळ तर कुठं होणार अतिवृष्टी पाहा संशोधक प्राध्यापक राहुल तोडमल यांचं विश्लेषण

वाढत्या तापमान वाढीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, संशोधनातून समोर आली गंभीर बाब
X

जागतिक तापमान वाढ होत आहे. हे सतत शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र, आपण त्याकडे किती लक्ष देतो? आता या तापमान वाढीचा शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होणार आहे. विद्याप्रतिष्ठानच्या कला, वाणीज्य, विज्ञान बारामती या ठिकाणी भूगोल विषयाचे प्राध्यापक असलेले प्राध्यापक राहुल तोडमल यांनी या संदर्भात अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी महाराष्ट्रात २०५० पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये हवामानात कोणकोणते बदल घडणार आहेत. या संदर्भात संशोधन केलं आहे. या संशोधनात प्रामुख्याने दोन गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे.


१. तापमान


२. पर्जन्य


या दोन घटकांच्या अभ्यासामध्ये बदलणारं तापमान आणि पर्जन्यमान याचा महाराष्ट्रातील शेतीवर नक्की काय परिणाम होणार आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांचा महाराष्ट्रातील शेतीवर नक्की काय परिणाम होईल. यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे.


संशोधनातून समोर आलेल्या बाबी कोणत्या?


तापमान वाढणार…


अलिकडच्या काळात पृथ्वीचं तापमान वाढत आहे. यात शंका नाही. अनेक संशोधनामध्ये पृथ्वीचं तापमान वाढेल, असं म्हटलं आहे. मात्र, येत्या काळात ते किती वाढेल? दक्षिण आशियामध्ये किती तापमान असेल? महाराष्ट्राची काय स्थिती आहे. या संदर्भात बोलताना डॉ. राहुल तोडमल सांगतात…


२०३३ नंतर महाराष्ट्रात तापमान जाणवेल. २०५० पर्यंत महाराष्ट्राचं तापमान ०.५ डिग्रीसेल्सिअस ते २.५ डिग्रीसेल्सिअस याच्या दरम्यान असणार आहे. साधारण पश्चिम घाटाचा विचार केला तर यामध्ये सातारा जिल्ह्याचा काही भाग येतो. पुणे जिल्ह्याचा काही भाग येतो. आणि सोलापूरचा काही भाग येतो. या भागामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत तापमान वाढ अधिक होईल. असं संशोधनात समोर आलं आहे.

पर्जन्यमान वाढणार की कमी होणार?

तापमान वाढ झाली म्हटल्यावर पर्जन्यमान घटणार की वाढणार? असा सवाल आपल्या समोर उपस्थित होतो. मात्र, या शोधनिबंधात महाराष्ट्रात भविष्यात २२५ मिलीमीटर पर्यंत वार्षिक पर्जन्य वाढ होईल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात ६०० ते ७०० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पर्जन्यमान वाढणार…


शास्त्रीयदृष्ट्या अर्थपूर्ण वाढीचा विचार केला तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पर्जन्यमान वाढणार आहे. म्हणजे ज्या भागात पर्जन्यवृष्टी अधिक होते. त्याग भागात पर्जन्य वाढ होणार आहे. असं संशोधनात समोर आलं आहे. परिणाम काय? ज्या भागात अधिक पाऊस आहे. त्या भागात पाऊस वाढला तर काय होईल? फायदा होईल की तोटा? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. मात्र, २०१९ मध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पंचगंगा नदीला आलेला पूर तुम्हाला आठवत असेल. त्यामुळे एक बाब लक्षात येते की, जर अशा प्रकारे पर्जन्यवाढ झाली तर शेतकऱ्यांच्या ही हिताची आहे का?


तापमान वाढ आणि शेती…


वाढलेल्या तापमानाचा शेतीवर काय परिणाम होईल. चांगला की, वाईट असा प्रश्न आता निर्माण होतो. वाढलेल्या तापमानामुळे पिकांच्या उत्पादनात घट होते. हे शास्त्रज्ञ सांगतात. हेच या संशोधनातून समोर आलं आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्वारीचं पीक घेतलं जातं. ज्या भागात ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. त्या भागातील तापमानाचा विचार केला असता, ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार की घट? याचा अभ्यास केला. यावर संशोधनात मोठी बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात २०५० पर्यंत ज्वारीच्या उत्पादनात १८ टक्के घट होणार असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. असाच फटका इतर पिकांना देखील बसणार आहे.


ऊस:

ऊस पिकवणाऱ्या प्रदेशाचा विचार केला तर ऊसाच्या पिकांमध्ये २२ टक्के घट होणार असल्याचं संशोधनात समोर आलं आहे.

तांदूळ:

कोकणाचं मुख्य पीक तांदूळ. तसंच महाराष्ट्रात इतर भागात जसं विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात देखील तांदळाचे पीक घेतलं जातं. तांदळाच्या उत्पादनात तापमान वाढ झाल्यास घट होणार की वाढ? या संदर्भात बोलताना तोडमल सांगतात….जर ४ डिग्रीसेल्सिअसने तापमान वाढणार असेल तर ४९ टक्क्यापर्यंत घटू शकते. मात्र, सध्या २.५ टक्के तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात देखील २० ते २५ टक्यांपर्यत उत्पादनात घट होणार आहे.


गहू

गव्हाच्या पिकाला थंडीचा वातावरण पोषक असतं. आता तापमान वाढ होणार म्हटल्यावर हिवाळ्यात घेतल्या जाणाऱ्या या पिकावर काय परिणाम होणार? तर तापमान वाढल्यामुळे हिवाळे देखील अधिक उबदार होतील. हिवाळ्यात तापमान वाढ झाल्यामुळे गव्हाची उत्पादकता घटली जाणार आहे.


यावर उपाय काय…


शास्त्रज्ञांनी भविष्यात वाढणाऱ्या तापमानाचा विचार करून नवीन वाणाचं संशोधन करायला हवं. ज्या पिकांच्या जाती जास्त तापमानात शेतकऱ्यांचं उत्पादन वाढू शकतात. अशा संशोधनावर भर द्यायला हवा.


पर्जन्यमान वाढणार तर पुढे काय?


पिकांच्या जातींच्या संशोधना बरोबरच पर्जन्यवाढ होणार असल्यानं शासनाने पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागात अधिक पाऊस पडणार असल्यातरी, तापमान वाढ झाल्यामुळं पर्जन्य छायेच्या प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळं या भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. दुष्काळ अधिक तीव्र स्वरूपात समोर येणार आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला पाण्याचं नियोजन करणं देखील अत्यंत गरजेचं आहे.




Updated : 28 April 2021 5:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top