Home > मॅक्स किसान > दिल्ली आंदोलन : सरकारने चर्चेची तारीख बदलली

दिल्ली आंदोलन : सरकारने चर्चेची तारीख बदलली

नवीन वर्षाच्या आधी शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल की हे आंदोलन नवीन वर्षात आणखी तीव्र होईल याचा फैसला 30 तारखेला होणार आहे.

दिल्ली आंदोलन : सरकारने चर्चेची तारीख बदलली
X

गेल्या 33 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी सरकारन पुन्हा चर्चा करणार आहे. थांबलेली चर्चा पुन्हा करावी असे आवाहन सरकारने केल्यानंतर शेतकऱ्यांनी 29 डिसेंबर ही तारीख दिली होती. पण सरकारने आता 29 ऐवजी 30 तारखेला दुपारी 2 वाजता चर्चा करावी असे पत्र शेतकरी संघटनांना दिले आहे. केंद्रीय कृषी सचिवांनी हे पत्र पाठवले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी कायदे रद्द करण्याची मागणी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 30 तारखेच्या चर्चेमध्ये सरकार कोणता प्रस्ताव देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या दिवशी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा दिल्लीच्या सीमेवर असलेल्या आंदोलनांच्या ठिकाणी जाणार आहे. तसंच देशभरातही विविध ठिकाणी असे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

शेतकरी संघटनांच्या सर्व आक्षेपांवर चर्चा करुन योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले आहे. पण सरकारने या पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचा उल्लेख केला नसल्याचा आऱोप शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे ही बैठक कितपत यशस्वी ठरेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चर्चेची तयारी दाखवली होती पण कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचेही स्पष्ट केले होते.

Updated : 29 Dec 2020 4:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top