आमदारांची नवी बॅच
X
महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेत एकूण 97 नवीन आणि तरुण आमदार आहेत. यातल्या बऱ्याच जणांवर जरी घराणेशाहीचा ठपका ठेवला जात असला तरी ही नवीन बॅच "जरा हटके" आहे. या साऱ्यां सोबतच काही राजकीय पार्श्वभूमी नसलेले देखील तरुण चेहरे सभागृहात आहेत. गेले आठवडाभर नागपूरला हिवाळी अधिवेशनात या सगळ्या तरुणाईला आणि त्यांच्या डेब्यु परफॉर्मन्सला जवळून पाहता आलं, काही गोष्टी जाणवल्या त्या शेयर कराव्याश्या वाटल्या.
फक्त आईवडिलांच्या मागेमागे राजकारणात फरफटत आलेले हे तरुण-तरुणी नाही. त्यांचा आपला विचार आहे. महत्वाचं म्हणजे राजकारणाबाबत एक "पॅशन" आहे, झपाटलेपण आहे. या तरुण आमदारांना यंदा राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करण्याची संधी मिळाली. सगळ्यांनीच संधीचं सोनं केलं! आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, अदिती तटकरे , झीशान सिद्दीकी यांच्यासोबतच अत्यंत सामान्य घरातून येणारे देवेंद्र भुयार यांनी देखील आपल्या भाषणाने छाप पाडली ! सोबतच, राजू नवघरे, राम सातपूते, रईस शेख यांच्यासारखेही अनेक तरुण आणि आश्वासक चेहरे आहेत.
आज देशातली तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. या सगळ्यांनी आपापल्या परीने हा मुद्दा उचलला आहे, आपापल्या पक्षाच्या लाईन प्रमाणे ठाम अशी भूमिका घेतलीये ! हे सारे भविष्यातील नेते आहेत,आज राजकारणातील पाहिली पायरी चढताहेत. आज जोश आहे, नव्याचं आकर्षण आहे म्हणून कदाचित हा उत्साह असेल, पण हा टिकणं गरजेचं आहे आणि हे टिकवणं यांच्या हातात आहे.
राजकारणातल्या घराणेशाहीचा मुद्दा खोडून काढणे तसं कठीण असलं तरी आपल्या कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख तयार करण्याची संधीच यांना मायबाप जनतेनं दिली आहे. याचं ते चीज करतील अशी अपेक्षा आहे, भविष्यातला महाराष्ट्र यांच्याकडे अपेक्षेने पाहतोय !!