Home > मॅक्स ब्लॉग्ज > आकाशाचा रंग निळा का असतो? प्रा. डॉ.आर.जी.सोनकवडे

आकाशाचा रंग निळा का असतो? प्रा. डॉ.आर.जी.सोनकवडे

आकाशाचा रंग निळा का असतो? प्रा. डॉ.आर.जी.सोनकवडे
X

आकाशाचा रंग निळा का असतो? हा प्रश्न ज्यांना सुचला आणि आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हा वर्णपंक्तीचा शोध घेतला व रामण परिणामाची नांदी झाली. अवघ्या अडीच वर्षातच त्यांच्या या शोधाला जगाने डोक्यावर घेतले १९३० मध्ये पदार्थविज्ञान शाखेत नोबेल पारितोषिक त्यांना बहाल केले गेले डॉ. सी. व्ही. रामण असे या अवलियाचे नाव. आपल्या देशात १९८८पासून 'विज्ञान दिन' राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात आहे.

विज्ञानातूनी जन्म आमुचा,
अन त्या रहस्यांचा,
मार्ग तो प्रगतीचा,
आनंददायी युरेका युरेका चित्काराचा

जीवनाला चव आणणारं मीठ म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. अज्ञान माणसाला अंधविश्वासी, अपरिपक्व बनवते तर विज्ञान माणसाला वास्तविक, तर्क-संपन्न, विवेकशील व विचारशील बनवतं. या ज्ञान विज्ञानाला आपण परमेश्वराचे रूप मानतो अगदी तशा प्रकारच्या ओळी आपल्या भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पाहावयास मिळतात.

"त्वं ज्ञानमयोविज्ञान मयोसि" ही ओळ श्री अथर्वशीर्षमधील असून ज्ञान आणि विज्ञान ही भगवंताची रुपे असून त्याची आपण तशीच साधना करूया असा उल्लेख पहावयास मिळतो. 'विज्ञानवादी वातावरण निर्माण करण्याची गरज आपल्यासारख्या विकसनशील देशांनाच का जाणवते कारण विकसित देशांमध्ये अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, जातिभेद, वर्ण, पंथ यांचे स्तोम माजलेले नाही आणि कार्यकारण भाव समजावून घेणारे लोक तिथे विपुल प्रमाणात आहेत. आपल्याकडे खेळ, मनोरंजन, जातिभेद राजकारण यांमध्ये गुरफटलेल्या लोकांना क्रिकेटच्या फायनल सामन्या इतका मोठा विज्ञान दिन वाटतो का आणि वाटला तरी तो फक्त त्याच दिवसापुरता मर्यादित का असतो? हा मोठा प्रश्न वाटतो.

कारण आज समाज भरकटत तर नाही ना, या विचाराने मन खिण्ण -विषण्ण होते. इथे क्रिकेट, राजकारणी,कलाकार, ४जी प्रति सेकंदा गतीने तर वैज्ञानिक फक्त २केबी प्रति सेकंद गतीने तयार होत आहेत. स्वामी विवेकानंद म्हणत, "तरुणांच्या जिभेवर कोणाचे नाव आहे सांगा मी त्या देशाचे भविष्य सांगतो."

विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे जिणे सुकर होण्यासाठी होतो. विज्ञान विकास दिवास्वप्नांवर नसून वास्तवतेवर अवलंबून असतो. ही सवय खरे तर एका दिवसाने लागणारी नाही तर जीवनातून विज्ञानाचे धडे घेत आपल्याला जिज्ञासा, चिकाटी, संयम यांचा संमिश्र भाव बाळगण्यास शिकले पाहिजे.

मानवाला लाभलेल्या या विज्ञानरूपी परिसाने त्याने अज्ञानरुपी अंध:काराचा नाश केला. चाकाच्या शोधाने आपल्या आयुष्याला गती दिली.अनेक यंत्रोत्पत्ती करून कामाची गती व गुणवत्ता यांची गाडी पण वेगवान झाली. ज्ञानाच्या शाखा रुंदावत संगणीकरणातून एकविसाव्या शतकात दळणवळण व माहिती संक्रमण यांचे अफाट जाळे विस्तारले. सर्व क्षेत्रात ज्ञानाची कवाडे खुली झाली. माणसाने अग्नी निर्माण करून खाद्यजीवन सुधारले. भूमी सागराप्रमाणे अंतरिक्षा वर सुद्धा आपले स्वामित्व प्रस्थापित केले. धान्यनिर्मितीचे प्रयोग करून हरित क्रांती घडवली. वस्त्रप्रावरणे वापरून सुसंस्कृतता अंगी भिनवली. घरे, राहणीमान, विचार सर्वांचेच आधुनिकीकरण केले. एकंदरीत प्रगतीचा परम उत्कर्षबिंदू काढला.

अशाप्रकारे विज्ञानाला सुजलाम- सुफलाम बनवणाऱ्या या महान विभूतींचा सन्मान प्रत्येक वर्षी केला जातो. यंदाच्या विज्ञान पंढरीच्या मानाच्या वारकर्‍यांची नावे आहेत ती म्हणजे रॉजर पेनरोज,रेनहार्ड गेंजेल, आणि अॕड्रिया गेंज. रॉजर पेनरोज यांनी सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताच्या सहाय्याने कृष्णविवरांच्या निर्मितीचे भविष्य वर्तवता येते असे सांगितले. तर गेंजेल व गेंज यांनी या आकाशगंगेचे रहस्य उलगडून दाखवण्याचे कार्य आपल्या संशोधनातून केले.

'अति सर्वत्र वर्जत्ये' असाही अनुभव आपल्याला आजतागायत येतो आहे. आज कोरोनाची टांगती तलवार सतत डोक्यावर आहेच. कितीही फुशारक्या मारल्या तरी माणसाची प्रगती किती फोल आहे. औषध निर्मितीचे क्षेत्र सुद्धा हतबल असल्याचं जाणवतं. या क्षणी आपण केलेल्या प्रगतीचा खोटा मुखवटा निसर्गाने उतरवल्याचे अनुभवास येते. तुटपुंजी प्रगती, त्याचा गर्व करणारा यंत्रवत वागणारा मानव ते निसर्गापुढे हतबल असणारा कठपुतली प्रमाणे भासणारा मानव असा साक्षात्कार सर्वांना झाला आहे. म्हणून एवढेच सांगावेसे वाटते की प्रत्येकाने शास्त्रज्ञ असावी हे जरुरी नाही पण प्रत्येकाने शास्त्रोक्त विचार करावेत. इथे शास्त्रज्ञ निरीक्षणांचे समायोजन करण्यासाठी अनेक गृहितके मांडतात व मग पुराव्यांचा अभ्यास करून एकेक गृहीतक आवडत असलं तरी नाकारावं लागतं आणि पुढे जातात. आपल्या आवडत्या सिद्धांतात भावनिक गुंतवणूक करून तिथे अडकून पडत नाहीत.अगदी याचप्रमाणे आपल्यावर घोंगावणाऱ्या भीषण संकटांना कोणत्याही राजकीय, धार्मिक, बांधिलकीमध्ये स्वतःही न अडकता इतरांनाही न अडकवता या अडगळींना तिलांजली देऊन सर्व काही सुशेगात करूया आणि उणीदुणी काढण्यापेक्षा सर्व प्रकारच्या श्रद्धा, निष्ठा, मतभेद यांची नाळ तोडून 'सर्वे सन्तु निरामयाः' अशी सद्यस्थिती बनवण्यासाठी सज्ज होऊया. मर्ढेकरांची पुण्यतिथी येतच आहे. त्यांना जरा आठवूया आणि म्हणूया, येऊ दे गा, शास्त्र काट्याची कसोटी

नोकरशाही मधील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पैशाच्या तुलनेत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यास वेतन खूप कमी असतं. तो सुरुवातीच्या काळात जास्त कार्यशील, सक्रिय, कल्पक व उत्साही असतो. नंतर त्याच्या कामात शैथिल्य येतं. याच काळात त्यांना अधिक प्रोत्साहन, आर्थिक फायदे मिळत नाहीत. तर या गोष्टीसुद्धा प्रकाशझोतात येण्याची गरज आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात निशीदिनी कार्यरत राहून नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, प्राध्यापक गण तसेच तत्वज्ञ यामुळे विज्ञानाची प्रतिपदेच्या चंद्रकोरीच्या वाढीप्रमाणे हळूहळू का होईना उन्नती होत आहे. परंतु जनसामान्यांमध्ये मराठीला विज्ञान भाषा बनवली तर विज्ञानाची रुजवणूक सहज होऊ शकते. कारण या शब्द श्रीमंत भाषेमुळे विज्ञानाबद्दल आवड निष्ठा अजून दृढ होईल. या सह्याद्री कन्येस मानाचे स्थान दिले तर जनसामान्यांच्या तनामनात नसानसांमध्ये विज्ञानाचे मुलमंत्र भिनल्याशिवाय राहणार नाहीत.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
अशी खंत व्यक्त करणाऱ्या सुरेश भटांना आपणच
विज्ञान भाषा होईल नक्की,
आपली मराठी हे आश्वासन देऊया.

प्रा.डॉ. राजेंद्र गिरजाप्पा सोनकवडे,
अधिविभाग प्रमुख,विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्र, प्राध्यापक,

भौतिकशास्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. माजी वरिष्ठ वैज्ञानिक, आय. यू. ए. सी. यूजीसी, दिल्ली
भ्रमणध्वनीः८३२९३७५२४८

(लेखक उच्च शिक्षण क्षेत्रात २५ वर्षांपासून कार्यरत आहेत.)

Updated : 28 Feb 2021 5:59 PM IST
Next Story
Share it
Top